महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून सरकारने कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा निर्णय रद्द करून तातडीने राज्यात शिक्षक भरती करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. तातडीने भरती न केल्यास राज्यभरात मोठा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे.
या पत्रात डॉ. तांबे यांनी म्हटले आहे की, राज्यभरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मध्यंतरी शासनाने विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान देण्याचा चांगला निर्णय घेतला. परंतु या शाळांना अद्याप अनुदान मिळाले नसून सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान देणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असून त्यामध्ये प्रामुख्याने पेन्शन योजना,शाळांना वेतनेतर अनुदान दिले जात नाही. शिक्षकेतर कर्मचारी भरती सुद्धा अनेक वर्षापासून बंद आहे.
शाळेमध्ये विषयानुसार कला व क्रीडा शिक्षक नाही. शिक्षण विभागाचे अनेक इतर प्रश्नही प्रलंबित आहेत. त्यावर कुठलाही निर्णय घेतला जात नाही. त्यातच शासनाने 7 जुलै रोजी परिपत्रक काढून राज्यातील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे.
राज्यात शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. वर्गात शिकवण्यासाठी शिक्षक नाही. त्यामुळे शाळा चालवणे अवघड झाले असून अनेक युवक शैक्षणिक पात्रता असूनही या जागांपासून वंचित आहेत. या सर्व गोंधळाचा परिणाम संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर होत असून याचा गुणवत्तेवरही अतिशय गंभीर परिणाम होत आहे.
कंत्राटी अथवा सेवानिवृत्तांना मानधनावर नेमण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर पदवीधर व पात्र तरुणांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होऊन राज्यभरात मोठे आंदोलन होईल. यास शासन जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने तातडीने हे परिपत्रक रद्द करून एक महिन्याच्या आतमध्ये शंभर टक्के शिक्षक भरती करावी, अशी मागणी आमदार डॉ. तांबे यांनी केली आहे.

