महाराष्ट्र संवाद न्यूज
अकोले – अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर ओसरला असला तरी ओढून आले प्रवाहित असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ३५ मिलिमीटर पावसाचे नोंद झाल्याने धरणाचा पाणीसाठा ७७२४ दलघफु म्हणजेच ६९.९७ टक्क्यांवर तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा २७६७ दलघफु म्हणजेच ३३.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणांच्या लाभक्षेत्रासाठी ही समाधानाची बाब आहे.
भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. उत्तर नगर जिल्ह्याला ही धरणे वरदान ठरले आहे. नव्यानेच कालव्यांच्या चाचणी झालेल्या निळवंडे धरणाच्या पाण्याचा फायदा दुष्काळी १८२ गावांना होणार असल्याने हे धरण कधी भरते याची देखील आस लागली आहे.
दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असल्याने धरणात आवक होणाऱ्या नवीन पाण्याचा वेग मंदावला आहे. तर दुसरीकडे भंडारदरा परिसरात पावसाची संततदार कायम असल्याने निसर्ग सौंदर्य खुलले आहे. त्यामुळे पर्यटकांची देखील गर्दी सुरू झाली आहे. यावर्षी भंडारदरा १५ ऑगस्ट पुर्वी भरण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत.

