महाराष्ट्र संवाद न्यूज
नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातासंबंधी धक्कादायक माहिती संसदेत लेखी उत्तरात दिली आहे. हे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकार विविध पावले उचलत असल्याचे ते म्हणाले.
भारतात दर तासाला सरासरी अठरा लोकांचा मृत्यू होत आहे. रस्ते अपघातात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर तर मृत्यूच्या आकडेवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले.
नितीन गडकरी यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, 2021 मध्ये देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधून मिळालेल्या माहितीनुसार देशात दीड लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
2021 मध्ये देशात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला जीव गमविला आहे. भारतातील रस्ते अपघाताच्या अहवालानुसार हा आकडा समोर आल्याचे ते म्हणाले. अपघात रोखण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता वाढविण्याकरिता सरकारने सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इतर माध्यमातून अनेक मोहिमा चालविल्या आहेत. याशिवाय रस्ता सुरक्षा लेखापरीक्षकांसाठी अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले आहेत.
समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीसाठी एअरबॅग अनिवार्य करण्यात आली असून सीट बेल्ट रिमाइंडर, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, ओव्हर स्पीड वार्निंग सिस्टीम यासारखे बदल अनिवार्य करण्यात आले आहेत.
ओव्हर स्पीड, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर, अल्कोहोल किंवा ड्रगच्या प्रभावाखाली वाहन चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न वापरणे आदी या अपघातांमागील प्रमुख कारणे असल्याचे ते म्हणाले.

