महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यात 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेवर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे. यातून या शेतकऱ्यांनी 1754 कोटी रुपयांची केंद्राची मदत लाटली आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्याकडून या रकमेची वसुली सुरू केली असून आत्तापर्यंत एक लाख शेतकऱ्यांकडून 93 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांसाठी येत्या ऑगस्ट महिन्यापासून ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना लागू करण्यापूर्वीच हा घोटाळा समोर आला आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ऑगस्ट पासून राज्य सरकार देखील या योजनेत आणखी भर घालून नमो शेतकरी महासन्मान योजना लागू करण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या योजनेद्वारे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
मात्र पूर्वी केंद्राच्या योजनेचा राज्यातील 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्राच्या योजनेच्या अंमलबजावणीत देखील अनेक त्रुटी असल्याचे समोर आले. या कृपेंचा फायदा उठवत शेतकऱ्यांनी 1754.50 रुपये लाटले आहे. त्यामुळे राज्याची योजना राबवताना सरकारला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.
विशेष म्हणजे मदत लाटणाऱ्यामध्ये हजारो शेतकऱ्यांकडे जमीन नसल्याचे, काही नोकरदारांनी शेतकरी असल्याचे दाखविले असून हजारो शेतकऱ्यांनी प्राप्तिकर भरत असल्याचे लपवून ठेवत योजनेचा गैरफायदा घेतला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने योजनेत काही बदल केले असून त्यानंतर आता चौदाव्या हप्त्यासाठी राज्यातील 76 लाख 55 हजार शेतकरी प्राप्त ठरले आहे.

