महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. महिलांवरील अत्याचारामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने मणिपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी संगमनेरमध्ये बुधवारी (ता. 26 जुलै) महिलांचा निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
संगमनेर बस स्थानकापासून बुधवारी दुपारी तीन वाजता नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे.
मणिपूरमधील महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. गुन्हेगारीला जात, धर्म, पंथ काही नसून तो गुन्हेगार मानवतेचा दुश्मन असतो. मणिपूरमध्ये सध्या हिंसाचाराबरोबरच महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. भारताच्या बहुतांशी भागात अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.
दिवसेंदिवस अमानवीय घटना घडत असून या विकृत मनोवृत्तीचा देशासह जगभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. महाराष्ट्रसह संगमनेरमध्ये देखील यासंदर्भात संतापाची लाट असून संगमनेर तालुक्यासह शहरातील महिलांचा निषेध मोर्चा काढला जाणार आहे.
तरी या महिला मोर्चासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयहिंद महिला मंच व संगमनेर शहरातील महिला मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

