महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा याची कायदेशीर लढाई आता सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह आहेत.
गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. विशेषत: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर या घडामोडींनी गेल्या वर्षभरात मोठा वेग घेतला. वर्षभरापूर्वी शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्या हाती आली. त्या पाठोपाठ महिन्याच्या प्रारंभी महाविकास आघाडी सरकार मध्ये असलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील आपल्या सहकाऱ्यांसह सरकारमध्ये सहभागी झाले. नव्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये देखील त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा कायम राहिली.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सर्व नेत्यांसाठी खातेवाटप देखील करण्यात आलंय. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. याच फुटीमध्ये जे दोन गट पडले आहेत त्यापैकी एका गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या याचिकेवर भूमिका मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
अजित पवार यांनी 30 जूनला केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी आपणच पक्षाचे प्रमुख आहोत, त्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याकडे राहावं, अशी याचिका अजित पवार गटाने निवडणूक आयोगात दाखल केली आहे. अजित पवार यांच्या या याचिकेवर आता शरद पवार गटाला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर पक्ष नक्की कुणाचा याबाबत निवडणूक आयोगात याचिका सुरु होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेना पक्षासारखीच फूट पडली आहे. शिवसेना पक्षात वर्षभरापूर्वी देखील अशीच फूट पडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगत हे प्रकरण गेलं होतं. आतादेखील तशाच घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाद आता निवडणूक आयोगात पोहोचला आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक आयोग दोन्ही पक्षाची भूमिका ऐकून घेईल. त्यानंतर योग्य निर्णय देईल. या सुनावणीसाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे.

