महाराष्ट्र संवाद न्यूज
रविवार विशेष | प्रवीण पुरो
सत्ताधारी विचारांच्या लोकांची मानसिकता सत्तेची दहा वर्षं पूर्ण होत असतानाही बदलायचं नाव घेत नाहीए. ऐरागैरा कोणीही कशावरही बोलत असतो. कधी कंगनासारखी अभिनेत्री स्वातंत्र्य 2014 ला मिळाल्याचं वक्तव्यं करते तर कधी कोणी देशाला गांडू लोकांचा देश संबोधतो. कोणी जवाहरलाल नेहरूंच्या नावाने शिविगाळ करतो तर कोणी महात्माजींच्या नावाला दोष लावतो. या दोन व्यक्तींना नाव ठेवलं की त्या व्यक्तीचं सत्ताधारी मंडळी पुनर्वसन करत असतात अशी एक प्रतिमा केंद्रातल्या मोदी सरकारची आणि राज्यातल्या महायुती सरकारची झालेली आहे. या सरकारांचे पाठीराखे असलेले मनोहर कुलकर्णी नामक भिडे गुरुजींनी तोडलेले तारे लक्षात घेता त्यांना आता कशाचीच भीती उरलेली नाही असंच दिसतं.
वयाची नव्वदी गाठू पाहणार्या या गुरुजीने महाराष्ट्रालाही संकटात टाकलं आहे. ज्या थोर व्यक्तींना देश आणि जगातील लोक देवासमान मानतात त्याच व्यक्तींविषयी गलिच्छ आणि अत्यंत निंदाजनक वक्तव्यं करत या माणसाने महाराष्ट्राच्याच थोबाडीत मारून घेतली आहे. या माणसाचा करावा तितका धिक्कार कमीच आहे. आपली लायकी नसताना जेव्हा एखादी व्यक्ती बडबड करत असते अशा व्यक्तीकडे खरं तर कोणी पाहूच नये. पण काळ सोकावला की त्याची दखल घेण्याची आवश्यकता असते. दुर्देवाने केंद्रातलं सरकारला याचं काहीच वाटत नाही. महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार यावर काय करणार हे लवकरच दिसेल. आजवर महात्माजींच्या नावाने राजकारण करणारी अजित पवार कंपनी या सरकारमध्ये सामील झाल्याने कारवाई होतेय का ते पहायचं. अन्यथा हे ही त्याच कळपातले माळकरी आहेत असं समजून घेण्याशिवाय पर्याय नाही. या निमित्ताने ह्यांच्या ओठात आणि पोटात काय तेही दिसेल.
या भिडेंनी महात्मा गांधी हिंदू नव्हते, ते मुस्लिम होते, असं सांगत सार्या देशाला अस्वस्थ केलं आहे. महात्माजींविषयी वा त्यांच्या विचारधारेविषयी अनेकांचे वाद असू शकतील. पण त्यांच्या धार्मिक अस्तित्वालाच हात घालण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो कोणी वापरत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्याची निश्चित आवश्यकता आहे. महात्माजींवरील या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कोणी रस्त्यावर यायची गरज नाही. गांधी ही संकल्पनाच विश्वव्याप्त आहे. जगभरात महात्माजींची महती ही अलौकिक आहे. अहिंसेचा जागतिक मंत्र देणारा असा माणूस झाला नाही, ही जगख्याती केवळ एकाच व्यक्तीला मिळाली ती व्यक्ती होती महात्मा गांधी. जग ज्यांच्यापुढे नतमस्तक होतं अशा महान व्यक्तीवर चिखलफेक करणं ही विकृतीच म्हणता येईल. इतकं वायफळ बोलण्यास मनोहर भिडेचा धीर चेपतो याचं कारण त्याचे पाठीराखे सत्तेत आहेत हे होय.
महात्माजींच्या नावाने शंख पिटणारी माणसं सत्तेत येऊन बसल्याने भिडे गुरुजींसारखी माणसं सुटल्यागत बडबडू लागली आहेत. देशात वाद निर्माण होईल, दंगली पेटतील, लोकं रस्त्यावर येतील, याचा फायदा आपल्याच होईल, याची जाणीव असलेली माणसं हे सारं खपवून घेत आहेत. अशी वक्तव्यं करणार्या कोणाही व्यक्तीची रवानगी ही तुरुंगात असायला हवी होती. पण आजचे सत्ताधारी हे करायला तयार नाहीत. भीमा कोरेगावच्या घटनेनंतर या सरकारने भिडेंचे लाड केले. नावाजलेल्या मान्यवरांविरोधात गुन्हे नोंदवून त्यांना चार वर्षं तुरूंगात डांबणार्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) गुन्ह्याची नोंद झालेल्या भिडे आणि मिलिंद एकबोटेला हात लावला नाही. हे दोघंही बाहेर राहून देशात वाद निर्माण करत असतानाही कारवाईचा पत्ता नाही. याने अशा व्यक्तींची मजल वाढणार हे कोणी सांगायची आवश्यकता नाही.
मनोहर भिडेंचे हे प्रताप आजचे नाहीत. वायफळ वक्तव्य करत या माणसाने देशातील वातावरण कलुषित करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. कधी तो 15 ऑगष्ट या स्वातंत्र्य दिनाची चेष्टा करतो. ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस काळा दिवस म्हणून पाळण्याचे आदेश तो आपल्या अनुयायांना देतो. तर कधी देशाने स्वीकारलेल्या तिरंगा झेंड्याचाही अवमान करतो. तिरंगा झेंडा न वापरता भगवा फडकवण्यास फर्मावतो. पुढे जाऊन त्याने राष्ट्रगीतालाही गैर ठरवून टाकलं. भिडेंच्या विकृतीचा हा कडेलोटच म्हटला पाहिजे. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाईसारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असं सांगताना या माणसाची जीभ अडखळली नाही. कारण भिडेंच्या जिभेलाच हाड उरलेलं नाही. राष्ट्रगीताची निर्मिती करणार्या रविंद्रनाथ टागोरांना जी व्यक्ती खुलेआम दोष देते ती व्यक्ती काय लायकीची असावी? पण तरीही आमचे पंतप्रधान या माणसाचे गोडवे गात आहेत.
आपल्या देशाचा ध्वज हा भगवा नाही तोवर शांत बसायचं नाही, या त्याच्या चिथावणीची तात्काळ अटक करून सरकारने चिरफाड करायला हवी होती. गृहमंत्र्याने हे वक्तव्य बरोबर नाही, इतकं सांगत कारवाईकडे मात्र पुरतं दुर्लक्ष केलं. जो माणूस महात्माजींच्या वा रविंद्रनाथांच्या करंगळीचं टोकही बनू शकत नाही, तो अशा महान व्यक्तींविषयी काहीही बोलतो आणि सरकार निमूटपणे ऐकून घेतं यासारखं दुर्दैव नाही.
एका महिला पत्रकाराला तिने कपाळावर कुंकू लावल नसल्याचं कारण देत जो तिचा अवमान करतो, तिला कुंकू लावून ये मगच तुझ्याशी बोलतो, असं सांगणार्या या माणसाने तमाम महिला वर्गाचाच अवमान केला. मुलं होण्यासाठी आपल्या बागेतील आंबा खायला सांगत हा माणूस अंधश्रध्देत महिलांना अडकवतो. तरी कारवाई होत नसेल तर सरकारच्या नाकर्तेपणाचाच निषेधच केला पाहिजे.
या वयात काय बोललं पाहिजे, इतकी जाण नसलेल्या माणसाला त्याचे अनुयायीही काही सांगत नसावेत वा सांगितलं तर त्यांचंही तो ऐकत नसावा असंच दिसतं. स्वाभीमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्तान असल्याच्या सांगलीच्या दुर्गामाता दौडीत बाता मारणारा हा माणूस याच निर्लज्ज माणसांमध्ये राहातो, हेच लक्षात घेत नाही. या माणसाच्या कष्टाने चाललेल्या व्यवस्थेचं खातो तरी त्याला देशाविषयी प्रेम नसेल तर त्याने हिंदुस्तान सोडलं पाहिजे. या देशात त्याने राहिलंच पाहिजे, अशी कोणी बळजबरी केलेली नाही.
187 राष्ट्रांमध्ये गुलामी आणि दास्यांच्या नरकात राहाण्याची लाज वाटत नाही अशा बेशरम माणसांचा देश, परकीयांचं उष्ट खाणारा देश अशा शब्दात तो भारताला गणतो याचा अर्थ कोणाला कळत नाही असं नाही. शहाण्याने मुर्खाच्या वाट्याला जाऊ नये म्हणून लोक भिडेकडे दुर्लक्ष करतात. याचा तो अतिफायदा घेऊ लागल्याचं हे द्योतक आहे. कोरोनासारख्या असाध्य रोगाने मृत्यूमुखी पडलेल्यांविषयी संवेदना व्यक्त करण्याऐवजी या माणसाने त्यांची टिंगल उडवली. मृत्यूमुखी पडले ते जगण्याच्याच लायकीचे नव्हते, असं बोलून त्याने मृतांच्या नातलगांचाही अवमान केला. कोरोना काळातील पोलिसांच्या कारवाईला दोष देताना भिडेने लोकांना बंड करण्याची चिथावणी दिली होती. कठीण प्रसंगी माणसाने कसं वागू नये, याचं भिडे हे ढळढळीत उदाहरण होय.
कोरोना हा रोग नाही तो गांडू लोकांना झालेला मानसिक रोग होता, असं सांगणार्या भिडेने जगभरातील परिस्थिलाही अव्हेरलं. म्हातारी मेल्याच्या दु:खाहून काळ सोकावणं गंभीर असतं. भिडेंच्या असल्या अचरटपणाने काळ सोकावू लागला आहे. तरी देशातलं आणि राज्यातलं सरकार बघ्याची भूमिका घेणार असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने काय तो बोध घेतला पाहिजे. सामान्यत: टीका केली की विरोधी पक्ष नेत्यांच्या विरोधात सातत्याने गुन्हे नोंदवत राज्यातल्या सरकारने आधीच आपल्यातला बाणेदारपणा दाखवला आहे. आता विकृत भिडेंच्या विरोधात कारवाईसाठी सरकार पुरुषार्थ दाखवणार की बोटचेपे धोरण घेणार हे लवकरच पाहायला मिळेल.

