महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – तृतीय पंथीय असल्याचे भासवत कोल्हार-घोटी मार्गावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला पकडल्यानंतर संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने गुन्ह्यातील आरोपींची अटकेतून मुक्तता होणार आहे.
या आरोपींना झाला जामीन मंजूर : संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 14 जुलैला गुन्हा रजिस्टर नंबर 577/2023 नुसार संजय मारुती शिंदे (वय 25 वर्षे रा. चिसखेड, ता. भोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, सुनिल बाबुराव सावंत (वय 32 वर्षे रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, राजेश शंकर शेगर (वय 25 वर्षे रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, साजन शिवलाल चव्हाण (वय 25 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा व किशोर महादेव इंगळे (वय 21 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा) यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 399 402 अन्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या सर्व आरोपींची न्यायालयाने काही अटींवर जामीनावर मुक्तता केली. मंगळवार आणि शुक्रवारी आरोपींना पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार आहे.
का केली होती कारवाई : गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर तालुक्यामध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. दुचाकी चोऱ्या तर नित्याच्याच झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी हिस्ट्रीशिटर चेक करणे, टु प्लस मधील आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती घेणे, नाकाबंदी, पेट्रोलींग करणे अश्या प्रकारच्या समांतर कारवाया चालु केल्या.
यांनी केली होती कारवाई : याशिवाय पोलीस स्टेशनच्या दप्तरी नसलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सापळा रचुन चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खाडे, पोलीस नाईक विजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, रोहीदास शिरसाठ, अविनाश बर्डे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, अजित कुऱ्हे, अतुल उंडे यांचा समावेश होता. शुक्रवारी (ता. 14 जुलै) पावणेचार वाजण्याच्या सुमारास भूमी अभिलेख कार्यालयाजवळ पावबाकी रस्त्यावर हे पथक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करत होते.
या दरम्यान काय घडले : या दरम्यान नाकाबंदीच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत एक शेवरलेट कारचालक कार घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत त्याला पकडले. कारची तपासणी केली असता त्यामध्ये प्रथमदर्शनी दोन महिलांसह सहा जण आढळून आले. तसेच कारमध्ये असलेल्या संशयितांकडे लाकडी दांडके, लोखंडी टॉमी, गज, लोखंडी कडे, साडी, मिरची पूड रोख रक्कम असा मुद्देमाल आढळून आला. पथकाने कारसहा जणांना पकडत त्यांच्याकडून 2,83,150 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
रस्ता लूट करण्याचा होता प्रयत्न : पकडलेल्या संशयितांची चौकशी केली असता त्यातील दोन्ही महिला पुरुष होत्या. तसेच तृतीयपंथीयाचा वेश परिधान करून या टोळीचा महामार्गावर वाहनांवर दरोडा घालण्याचा प्रयत्न असल्याची माहिती चौकशीत समोर आली होती.
जामिनासाठी केला होता अर्ज : गुन्ह्यातील सर्व आरोपींनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ॲड. अजहर सय्यद यांच्या माध्यमातून जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश वाय. एच. आमेठा यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यांनी आरोपींना प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या व मंगळवार शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.

