महाराष्ट्र संवाद न्यूज
प्रेमानंद रुपवते तथा बाबुजी यांचा आज पाचवा स्मृतिदिन. बाबूजी आपल्यातून जाऊन पाच वर्ष पुर्ण झाली आहेत यांवर विश्वासच बसत नाही, असे वाटते की बाबूजी आत्ता-आत्ता गेले, पण काळ कोणासाठी थांबत नाही.
बाबुजींना कुशाग्र बुद्धिमत्तेची निसर्गदत्त देणगी होती. त्यांचे चौफेर वाचन होते. ते अभ्यासु आणि बहुश्रुत होते. राजकारणा बरोबरच संगीत, साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, विविध धर्म आणि संस्कृती याबाबत सखोल अभ्यास होता. बाबुजी समवेत खाजगीत गप्पा टप्पा मारणे म्हणजे एक प्रकारची मेजवानीच असे. निरनिराळया विषयांवर त्यांच्याकडे असलेला माहितीचा साठा खुला होत असे. शेर, शायरी, किस्से, विनोद, चुटकुले सहज सहज ऐकायला मिळत असे.
बाबुजी उत्तम वक्ते होते, व्याख्याते होते त्यांचे भाषण सर्व वयोगटातील श्रोते कान देऊन ऐकत असत. त्यांच्या भाषणात दरवेळी नवलाई असे. प्रेमानंद रुपवते यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या रुपवते आडनावाशी तंतोतंत जुळणारे ‘रुपवंत’ होते. ते दिसायला राजबिंडे होते. त्यांचे कपडे देखील रुबाबदार असत. कपड्यांच्या बाबतीत ते खूप चोखंदळ होते. नेहरुशर्ट, जॅकेट आणि पँट हा त्याचा नेहमीचा पेहराव,परंतु त्यात विविधता असे. खरे तर काही माणसे कपड्यांमुळे शोभून दिसतात तर काही माणसांमुळे कपड्यांना शोभा येते. बाबूजींच्या बाबतीत म्हणायचे तर त्यांच्यामुळे कपड्यांना शोभा येत असे.
भेटायला आलेल्या माणसाचे निम्मे दुःख दैन्य बाबूजींच्या स्मितहास्यानेच पळून जात असे. त्यांचे व्यक्तिमत्व एवढे लोभस होते की ते पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीला आपलेसे करीत असत. बाबुजींनी आपल्या राजकीय आयुष्यात चार निवडणुका लढवल्या त्यातील दोन मुंबईतून तर दोन अहमदनगर जिल्ह्यातून लढवल्या. १९९५ ची कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील निवडणूक ते सहज जिंकतील असे वातावरण होते.
परंतु बाबूजी निवडून आले तर आपल्याऐवजी तेच मंत्री होतील अशी भीती काँग्रेसमधील प्रस्थापित मंत्री, साखर सम्राट, शिक्षण सम्राट आदी नेत्यांना वाटली आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात या प्रस्थापित मंडळींनी बाबूजींना दगा दिला. त्यांनी त्यांची यंत्रणा बाबूजींच्या पराभवासाठी राबवली. बाबूजी सरळ माणूस, राजकारणातले छक्के पंजे, कुटील नीती, बेरकीपणा त्यांच्यात नव्हता. स्वकियानीच दगाफटका केल्यामुळे ते या निवडणुकीत पराभूत झाले.
२००९ च्या शिर्डी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाने तयारी करायला सांगितली. बाबूजी कामाला लागले. शिर्डी मतदार संघ पिंजून काढला. त्यासाठी प्रचंड पैसा खर्च झाला आणि ऐनवेळी ही जागा काँग्रेसने आरपीआयचे रामदास आठवले यांना देऊन टाकली. काँग्रेसने बाबूजींची फसवणूक केली. मुंबईतील दोन निवडणुकांमध्ये ते आपण पराभुत होणार आहोत हे माहीत असतांनाही ते लढले कारण ती त्यांची तत्वाची लढाई होती.
आजच्या काळात राजकीय विचारधारा आणि पक्षनिष्ठा क्षीण होत चालली आहे. अशा काळात २०१४ साली शिवसेनेकडून चालत आलेली शिर्डी लोकसभा मतदार संघाची खासदारकीची ऑफर त्यांनी नाकारली. हातातोंडाशी आलेला घास घालवला म्हणून त्यांचे चाहते, समर्थक नाराज झाले, पण त्यांनी विचारधारा आणि राजकीय संधी यांपैकी विचारधारेला महत्व दिले आणि राजकीय संधी निर्धारपुर्वक नाकारली.
निवडणुकीच्या राजकारणात सज्जन, सभ्य, सदाचारी माणसे सहसा यशस्वी होत नाहीत. बाबूजींच्या बाबतीत हेच घडले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणात यश मिळाले नाही. निवडणुका लढवतांना फार विधिनिषेध बाळगून चालत नाही आणि बाबूजींना नेमके तेच जमले नाही. बाबुजी निवडणुका जिंकले नाहीत, सिंहासनावर बसले नाहीत, याने काहीच बिघडले नाही. त्यांनी जे सार्वजनिक कार्य केले त्यातून हजारो माणसे जोडली. बाबुजी जाऊन पाच वर्षं झाली तरीही त्या हजारो कार्यकर्त्यांच्या हृदय सिंहासनावर बाबुजी आजही विराजमान आहेत. हेच त्यांचे सार्वजनिक जीवनातील मोठे यश आहे.
बाबूजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिनंदन
हिरालाल पगडाल, संगमनेर,
संपर्क क्रमांक ९८५०१३०६२१

