आपल्या गरजा मर्यादित ठेवायला शिका : प्राचार्य गायकवाड
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी माणसाने स्वतःशी तसेच इतरांशी संवादी राहण्याची आवश्यकता आहे. याच संवादाच्या माध्यमातून माणसाच्या आयुष्यातील ताणतणाव दूर होण्यास मदत होते, असे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा. भगवान जोशी यांनी केले.
ताण-तणाव कार्यशाळा : संगमनेर महाविद्यालयात शिक्षकेतर सहकाऱ्यांसाठी ताण-तणाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून जोशी बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड, कुलसचिव संतोष फापाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
…तर आयुष्यातील ताणतणाव दूर : जोशी म्हणाले, ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी संवाद फार महत्त्वाचा आहे. तो माणसाला निरोगी जगण्याचा संदेश देत असतो. संवादाच्या माध्यमातून अनेक गोष्टींमधून मार्ग निघत असतो. शारीरिक स्वास्थ आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने सूर्योदयापूर्वी उठणे आवश्यक आहे. यामुळे आरोग्य संपत्ती लाभत असते. ताण-तणावमुक्त जगण्यासाठी योग व प्राणायाम केल्यास त्यातुन आपल्याला निश्चितच आनंदाची अनुभूती मिळते.
प्राचार्य गायकवाड म्हणाले : आर्थिक नियोजनातून देखील आपल्याला ताण-तणाव मुक्त आणि आनंदी जीवन जगता येते. त्यासाठी आपल्या गरजा मर्यादित ठेवता आल्या पाहिजेत. आपला आहार-विहार, वेळेचे आणि कामाचे नियोजन, आपल्या प्राथमिकता नेमक्या कोणत्या आहेत? या सगळया गोष्टींचा विचार करून आपण पुढे चाललं पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात अशा उपक्रमांची आवश्यकता महत्वाची असते. त्यातून आपल्याला मोलाचा संदेश मिळत असतो.
कुलसचिव फापाळे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाचा उद्देश आणि त्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले. या उपक्रमासाठी शिक्षकेतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

