महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – श्रेय लाटण्यासाठी राजकीय दबाव वापरत संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाने ग्रामीण रुग्णालयामार्फत सुरू करण्यात आलेला दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम बंद पाडला. नीतिमत्ता भ्रष्ट झालेल्या भाजपच्या दबावाला शासकीय अधिकारी देखील बळी पडल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांनी केला आहे.
कतारी यांनी काय म्हटले आहे: दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून योजना राबविल्या जातात. यासाठी गेल्या महिन्यात संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून कॅम्प आयोजित करण्यात आला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत संगमनेर तालुक्यातील साडेतीनशे दिव्यांग लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती.
राजकीय दबावातून केला कार्यक्रम रद्द: गुरुवारपासून या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय जिल्हा रुग्णालयाने घेतला होता. त्यासाठी बुधवारी संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयामार्फत निरोप देण्यात आले होते. निरोप मिळाल्यानंतर गुरुवारी दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने जमले होते. अपेक्षेप्रमाणे ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून गुरुवारी दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात झाली होती. मात्र ही बाब स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी राजकीय दबाव वापरत प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम बंद पाडला.
दिव्यांगांना धरले वेठीस: तांत्रिक अडचण दाखवत सुरू असलेला प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर करत यासाठी नव्याने पुन्हा तारीख जाहीर करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केल्याने दिव्यांग बांधवांना पुन्हा परतावे लागले. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचे हे वर्तन चुकीचे असल्याचा आरोप करत केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी दिव्यांग बांधवांना अशाप्रकारे वेठीस धरण्यात आले, त्यांचा अवमान करण्यात आला. या कृतीद्वारे भाजपची नीतिमत्ता देखील भ्रष्ट झाल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.
पाठपुरावा करणार: स्थानिक भाजपच्या दबावाला बळी पडणाऱ्या संगमनेर ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी शिवसेना पाठपुरावा करणार असल्याचे तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे आणि शहर प्रमुख अमर भाऊ कतारी यांनी म्हटले आहे.
कारवाईसाठी वरिष्ठांकडे तक्रार करणार
… या प्रकारामुळे दिव्यांग बांधव दुखावले गेले असून दबावाला बळी पडलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांगांचा अवमान झाला आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर उच्चस्तरावरून कारवाई व्हावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक आरोग्य मंत्री तसेच समाज कल्याण मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.
जालिंदर लहामगे, जिल्हाप्रमुख, दिव्यांग सहाय्य सेना.

