रविवार विशेष लेख | प्रवीण पुरो
नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात लोकसभेत देण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चा आणि त्याला सत्ताधार्यांनी विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं उत्तर जगाने पाहिलं. डोक्यात गेलेली सत्ता, या सत्तेचा अहंकार आणि सत्ता आपल्यासाठीच असल्याचा माज पाहून अनेकांना हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत याचंच आश्चर्य वाटत होतं. गेल्या नऊ वर्षांच्या सत्तेत जी दुषणं मोदींनी विरोधकांना दिली त्यात जराही फरक जाणवला नाही. सत्तेतील एखादा मंत्री किंवा खासदार खोटं बोलला तर त्याकडे लोक दुर्लक्ष करतात. त्याला तितकं महत्व देत नाहीत. पण देशाचा प्रमुख असलेला पंतप्रधानच खोटं बोलू लागला तर ती लोकशाहीची आणि संसदेची थट्टाच होय. अर्थात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांना संसदेचं काहीही पडलेलं नसतं. यामुळे तोंडात येईल ते बोलून ते स्वत:बरोबरच देशाचीही इभ्रत घालवत असतात.
याआधी विदेश दौर्यांवर असलेले पंतप्रधान धादांत खोटे बोलताना जगाने पाहिलं. देशात एका आठवड्यात एक आयआयटी, दिवसाआड महाविद्यालय, दोन दिवसात एक आयटीआय, तीन दिवसात आयएमएमची निर्मिती मोदींच्या तोंडून ऐकताना तिथे उपस्थीत असलेल्यांनी टाळ्या दिल्या. तेव्हा मोदी टाळ्या कशावर घेतात याची जाणीव देशवासीयांना झाली. तिकडे त्यांनी खोटेपणावर टाळी घेतली आणि आपला पंतप्रधान छान खोटं बोलतो म्हणून इथे देशवासीयांनी एकमेकाला टाळी दिली. देश प्रमुखाचा हा घसरलेला टक्का होय.
स्वातंत्र्यांच्या 75 वर्षात इतका खोटारडा पंतप्रधान देशाने पाहिला नाही. जे करतो ते सांगायला लाज काय वाटावी? न केलेल्या गोष्टी विदेशात सांगून देशवासीयांना त्या कळणार नाहीत, इतका भारत आता निश्चितच मागास नाही. पूर्वी दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून आपले विद्यार्थी विदेशात शिक्षण घ्यायला जात. पण हळूहळू आपल्याकडच्या शिक्षणाचा दर्जा सुधारला आणि विदेशात शिक्षणासाठी जाणार्यांची संख्या कमी झाली. उलट भारतात शिक्षणासाठी येणार्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढली. आज शिक्षणासाठी भारतात प्रवेश मिळत नाही. तर मिळाला तर तो परवडण्यासारखा नाही म्हणून भारतातील विद्यार्थी विदेशात शिक्षण घेण्यासाठी जात असल्याचं चित्र असताना दिवसाआड महाविद्यालयाच्या आणि आठवड्यात आयआयटीच्या बाता कोणाला मारायच्या? निवडून येण्यासाठी भारताचा पंतप्रधान काहीही करू शकतो. तो खुलेआम खोटं बोलतोच पण गोध्रा हत्याकांड, पुलवामाचा हादसाही घडवून आणू शकतो, हे ही देशाने पाहिलंय.
झारखंडच्या मजूर महिलेला घर बांधून दिल्याच्या खोट्या जाहिरातीने पोलखोल करूनही पंतप्रधान मन की बातमध्ये फेकताना लोकांनी पाहिलंय. त्यांनी आता देशवासीयांना जोखायला घेतलंय असाच याचा अर्थ. मजूर महिलेला घर दिल्याची जाहिरात करणार्या मोदींच्या सरकारला त्या महिलेनेच उताणं पाडलं. मी आजही झोपडीत राहाते, तीही भाडं देऊन असं सांगणार्या या मजूर महिलेने सरकारने घर दिलं हे सफेद झुट असल्याचं सांगून टाकलं. एका मजुर महिलेने खोटारड्या पंतप्रधानांचा पोलखोल करूनही त्यांना याचं काही वाटत नाही, हे दुर्देव म्हटलं पाहिजे. देशासमोर उघडं पडायला होऊनही पंतप्रधान खोटं बोलण्याचं सोडत नाही.
देशाचा पंतप्रधानच खोटं बोलतो म्हटल्यावर त्यांच्या साथीदारांनी मागे काय म्हणून राहावं? तोच खोटेपणा अमित शहांनी केला. अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना यवतमाळच्या कलावती बाईंचा उल्लेख केला. ‘भारत जोडो’वेळी राहुल गांधी त्यांना भेटले, पण त्यांना काहीच दिलं नाही असं खोटच सांगितलं. सारी मदत मोदींनी केल्याचं ऐकवलं आणि अर्धवट खासदारांच्या टाळ्या घेतल्या. शहांच्या या खोटेगिरीला कलावती यांनीच खोडून काढलं हे बरंच झालं. सत्तेतली माणसं काय लायकीची आहेत, याची जाण लोकांना झाली. आपल्याला जी मदत मिळाली ती राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षामुळेच मिळाली असं त्यांनी स्पष्ट केलं. खरं तर यानंतर शहांनी संसदेची माफी मागायला हवी होती. पण लाज कोळून प्यायलेल्यांकडून अशा अपेक्षा करायच्या नसतात. आता खोटारडेपणा केला म्हणून सभागृहाचा हक्कभंग केल्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे.
ज्या मणिपूरच्या वांशिक कलहाच्या निमित्ताने मोदींवर अविश्वास प्रस्ताव आला त्या मणिपूरविषयी शब्द न उच्चारणार्या सत्ताधार्यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर आणि त्यांच्यातल्या घटक पक्षांवर चिखलफेक करत आपली मर्दूमकी दाखवली. संसदेत मुद्यावर बोलण्याऐवजी पंतप्रधान वाह्यात बोलून टाळ्यात घेत असेल तर असल्या चर्चाच नसलेल्या बर्या. उलट यामुळे भरडलेल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. विरोधकांच्या इंडिया या नावाला आक्षेप घेताना ‘पहिल्या आयला आघाडीतील 26 पक्षांचा अहंकार आणि दुसर्या आयच्या मागे गांधी कुटुंबाचा पक्ष’ असल्या शेलक्या वाक्यांचा आधार पंतप्रधान घेतो तेव्हा आपला पंतप्रधान किती मंदबुध्दीचा आहे, हे लक्षात येतं.
ज्या मणिपूरमध्ये आग भडकली आहे. त्या मणिपूरचा प्रश्न भाजपमुळे नव्हे तर काँग्रेसमुळे निर्माण झाल्याची हाकाटी मारताना गेल्या दोन टर्मपासून देशाचा कारभार आपण हाकतो, याचीही जाणीव पंतप्रधानांना झालेली दिसली नाही. आपल्यावर वा आपल्या सरकारवरचं त्यानुशंगाने पक्षावरचं संकट टाळण्यासाठी मोदी आणि शहा कोणत्याही निमित्ताचा आधार घेतात. सत्ता मिळाल्यापासून त्यांनी हेच उद्योग केले. नेहरूंना दोष दिला नाही, असं एकही भाषण त्यांनी कधी संसदेत दिलं नाही. इशान्येकडील राज्यांकडे नेहरूंनी पुरतं दुर्लक्ष केल्याचा आक्षेप राममनोहर लोहियांनी घेतल्याची आठवण मोदी आज आपल्यावरचं संकट दूर करण्यासाठी देत आहेत. हाच आरोप मणिपूरबाबत मोदींवर केला तर त्याला दोष कसा देणार?
राज्य जळत असताना मोदी विदेश वार्या करत राहिले. मे महिन्यात दोन अबलांची धिंड काढली जाते. त्यांच्यावर बलात्कार केला जातो, यावर बोलण्याऐवजी नेहरू आणि गांधी घराण्यावर बोलून ते गंभीर घटनेची थट्टा उडवतात. यावरून त्यांना मणिपूरचं कहीही पडलेलं नाही, हेच सिध्द होतं. ज्या नेहरूंचं निमित्त मोदी करतात त्या नेहरुंना जाऊन आज साठ वर्षांचा काळ लोटला. त्यांची सत्ता तर 1947 ची. नेहरू वा काँग्रेस चुकली म्हणून त्यांना जनतेने पायउतार केलं असं मानलं तर सत्ता मिळाल्याच्या 10 वर्षात मोदींनी इशान्येकडील राज्यांसाठी काय केलं याचा हिशोब दिला पाहिजे. सत्तेसाठी एका गटाला दुसर्याबरोबर झुंजत ठेवत भाजपने आणि केंद्रातल्या सत्तेने मणिपूरमध्ये घातकी राजकारण केलं. नेहरूंहून आपण मोठे असल्याचं दाखवण्याचा हा मोदींचा खाटाटोप सुर्यावर थुंकण्यासारखाच आहे.
नेहरुंबरोबर तुलनाच काय पण त्यांच्या नखाची सर नसलेला माणूस वायफळ टीका करतो यावरून त्याच्या अहंकाराने कोणता थर गाठला आहे, हे लक्षात येतं. मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या आणि मणिपूरच्या एन. बिरेन सिंह यांच्या राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेच मणिपूरचा उच्छाद वाढल्याचं सकृतदर्शनी दिसू लागल्यावर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. केंद्राच्या नियंत्रणातील सीबीआयवर विश्वास न राहिल्याने दत्ता पडसळगीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाकरवी देखरेख ठेवण्याचे आदेश द्यावे लागले. यावरून मोदींनी काय तो धडा घ्यायला हवा होता. गृहमंत्र्यांच्या नियंत्रणातील सीबीआयचं काम प्रामाणिकपणे चालतं यावरही या निर्णयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरही मोदींना परिस्थितीचं अकलन झालं असं त्यांच्या लोकसभेतल्या देहबोलीतून तरी जाणवलं नाही. निरंकुष सत्तेची ही घातक फळं होत. देशवासीयांच्या विश्वासाला आपण पात्र नाही, हेच मोदींच्या लोकसभेतील भाषणाने दाखवून दिलं.

