महाराष्ट्र संवाद न्यूज
रविवार विशेष @ प्रवीण पुरो
वकूब नसलेल्या व्यक्तीला एखाद्या पक्षाचा अध्यक्ष बनवला की तो कसा वाह्यात वागतो याचं उत्तम उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे यांचं देता येईल. प्रदेशाध्यक्ष कसा नसावा याचे दाखले या प्रदेशाध्यक्षाने भाजपला घालून दिले आहेत. पात्रता नसताना मोठी जबाबदारी आल्यावर अशी माणसं सगळ्यांनाच मोजतात. बावनकुळे यांची गत तशीच झाली आहे. त्यांच्या या वाह्यातपणाचे भाजप वगळता सगळ्याच पक्षाचे नेते बळी ठरले आहेत. त्यांनी पत्रकारांनाही सोडलेलं नाही. आपल्या पक्षाला टिकेपासून दूर ठेवायचं असेल तर पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा, असा सल्ला त्यांनी आपल्या पक्षाच्या तालुका आणि जिल्हा पदाधिकार्यांना दिला आहे. तिथे त्यांना काळा चहा पाजायचा की दुधाचा, हे ठरवून त्यांच्यापुढे जे पाहिजे ते ठेवा, असा मोलाचा सल्ला त्यांनी या पदाधिकार्यांना दिला आहे. जे पाहिजे ते म्हणजे काय, हे हवं तर सुजय विखेंना विचारा, ते याचा चांगला बंदोबस्त करतील, असंही हे प्रदेशाध्यक्ष महाशय बरळून गेले.
सुजय विखे यांना याचं काही वाटण्याचा प्रश्नच नव्हता. पत्रकारांना आपल्या खिशात घातल्याचे सुजय विखे यांचे उद्योग बावनकुळ्यांना माहीत असावेत. देशभर आणि राज्यात सुरू असलेल्या याच पक्ष ‘शिस्ती’मुळे बावनकुळ्यांनी पोटातलं ओठावर आणलं इतकंच. भाजपने पोसलेल्या असल्या वाह्यात पदाधिकार्यांचा समाचार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. बावनकुळे ही देवेंद्र फडणवीसांची भाजपला देण आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना या माणसाला फडणवीसांनी मंत्रीपद देऊन आपल्या ताटाखालचं मांजर करून ठेवलं होतं. नितीन गडकरी यांची पाठ सोडावी, या कूट नीतीसाठी बावनकुळेंना मंत्रिपदाची ही खिराफत होती.
मंत्री म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी दाखवून दिलेल्या करामतींनी सारा महाराष्ट्र आश्चर्यात बुडाला होता. वळणावरच पाणी वळणावर जातं, तसं बावनकुळेंचं झालं. लक्षात आल्यावर फडणवीसांनी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना खड्यासारखं दूर केलं. कोणाही स्वाभीमानी व्यक्तीने हे सहन केलं नसतं. मंत्री म्हणून आपण राज्यावर खूप काही उपकार केले असतील तर मागणी न करता उमेदवारी मिळणं हा त्या व्यक्तीचा अधिकार असतो. हा अधिकार पक्षाने आणि फडणवीसांनी हिरावून घेऊनही या महाशयांनी लाचारी सोडली नाही. उलट लाचारीचा कडेलोट केला. आपल्याला उमेदवारी मिळत नाही, असं पाहून त्यांनी आपल्या पत्नीचं नाव रेटण्याचा प्रयत्न केला. तिथे उमेदवारी भरली, पण पक्षाने एबी फॉर्म नाकारला आणि बावनकुळे तोंडघशी पडले. स्वत:च्या पाठीमागे यशस्वी मंत्री असं बिरुद लावणार्या व्यक्तीचा इतका अवमान होत असताना या माणसाने गडकरींना सोडलं पण लाचारी सोडली नाही. हवेची दिशा ओळखणारा आपल्या आई-वडिलांचाही विचार करत नसतो, तसं बावनकुळ्यांनी केलं. विरोधकांना कुटुंबाच्या पक्षाचे दाखले देणार्या बावनकुळेंनी आपल्या कुटुंबाचीही सोय करून ठेवली होती, हे लक्षात घेतलं पाहिजे.
मंत्री असताना या माणसाने खात्याला इतक्या ‘उंची’वर नेऊन ठेवलं की विचारता सोय नाही. सतराशे पन्नास भानगडींनी बावनकुळ्यांचं कार्यालय तेव्हा सजलं होतं. नागपूरच्या कोण्या कथित महिला पत्रकाराची सततची उठबस हा तर त्यांच्या कार्यालयातला आणि मंत्रालय प्रेसरूमचा चर्चेचा विषय बनला होता. सुरज तातोडे या बावनकुळेंच्याच नातेवाईकाने केलेल्या आरोपाने बावनकुळेंचा गड तेव्हा हादरून गेला होता. सतीश उके यांनी हे प्रकरण न्यायालयात पोहोचवल्याने तर अडचणींचा भला मोठा खड्डा बावनकुळ्यांपुढे निर्माण झाला होता. उकेंनी बावनकुळ्यांबरोबर फडणवीसांनाही खेचल्याने बावनकुळे वाचले. पुढे याच तातोडेला त्यांच्या सख्ख्या भावांकरवी खोटं ठरवत या मंडळींनी आपली पापं लपवण्याचे उद्योग पार पाडले.
सुरजने केलेले आरोप इतके गंभीर होते की सामान्य माणून या आरोपांनंतर पुरता कोलमडला असता. पण बावनकुळ्यांना या आरोपांचं काहीच वाटलं नाही. मंत्री असतानाची टक्केवारी, ठकेदारांकरवी मिळायच्या रक्कमा यातून निर्माण झालेल्या संपत्तीचा भांडाफोड केल्यानंतरही बावनकुळेंना फडणवीसांच्या कृपाशीर्वादाने राज्याचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं आणि त्यांना आभाळ ठेंगणं झाल्याचा भास झाला.
प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाचं काय करावं, हा त्यांचा आणि पक्ष नेते, कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. त्यात इतरांच्या ढवळाढवळीचा प्रश्न नाही. पण जेव्हा अशी जबाबदारी येते तेव्हा या पदाची लाज जाणार नाही, इतक्या माफक अपेक्षा त्या व्यक्तीकडून असतात. अध्यक्ष झाल्यानंतर ती जबाबदारी बावनकुळ्यांनी घ्यायला हवी होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना आपल्या जिभेला हाड नाही, याची जाणीव त्यांनी अनेकदा महाराष्ट्राला करून दिली आहेच.
प्रदेशाध्यक्ष झालो म्हणून आपण काहीही, कसंही बरळायला मोकळे, असं त्यांना वाटत असेल तर ते मुर्खांच्या कळपात आहेत, असाच अर्थ निघतो. भाजपचा प्रदेशाध्यक्ष कसा नसावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे बावनकुळे म्हणता येईल. या पक्षाने आजवर दिलेले प्रदेशाध्यक्ष हे महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणातले आदर्श होते. सुर्यभान वहाडणे, गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारख्या शुचिर्भूत प्रदेशाध्यक्षांच्या पंक्तीत बसण्याचा मान बावनकुळ्यांसारख्यांना मिळणं खरं तर नशिबच होतं. याचा फायदा घेण्याऐवजी शेलक्या शब्दात विरोधकांवर टीका करणं, त्यांची निर्भत्सना करणं असले उद्योग करत त्यांनी या पदाची रया घालवली.
बावनकुळेंचा पक्ष सध्या संकटाच्या वार्या करतो आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून तर पक्षाला सातत्याने पराभवाचे सामने करावे लागत आहेत. याआधी मुंबईत अंधेरीच्या जागेवर शिवसेनेला धक्का देण्याच्या नादात बावनकुळ्यांनी स्वत:चाही विश्वास गमावला. पुण्यातील कसबा पेठेच्या परंपरेच्या जागेवर कधी नव्हे तो पराभव पत्करावा लागला. हक्काच्या असलेल विधानपरिषदेच्या जागांवर पराभवाने शिक्कामोर्तब केलं. प्रदेशाध्यक्ष म्हणून झालेले हे पराभव लक्षात घेता खरं तर बावनकुळेंनी स्वत:ला रोखायला हवं होतं. पण त्यांची स्थिती सुटलेल्या वळू सारखी झाली आहे. 48 पैकी 45 जागा जिंकण्याची भीमघोषणा त्यांनी केली आहे. याकरता पत्रकारांना सांभाळावं लागणार. त्यांच्या या ढाबा क्लुप्तीची चर्चा देशभर सुरू आहे.
विजय मिळवण्यासाठी पत्रकारांना ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न देशभर सुरू आहेतच. महाराष्ट्राने यात मागे राहणं ही कमजोरी होती. ती बावनकुळ्यांनी भरून काढली. आपण चांगली कामं करतो, हा भास वर्तमानपत्रात आणि वाहिन्यांवर उमटला पाहिजे, याकरता राज्यातील सगळे ढाबे प्रदेशाध्यक्षांना राखून ठेवायचे आहेत. विरोध दूर करायचा मार्ग भाजपने दिल्लीपासूनच चोखाळला असल्याने बावनकुळेंनी नवं काही संशोधन केलेलं नाही.
आधीच विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने भाजपच्या गळ्याची कोरड वाढवली आहे. त्यात महाराष्ट्र राखायचा म्हणजे अपेक्षेहून कितीतरी मैल दूरचा पल्ला होय. हा पल्ला गाठण्यासाठी एकनाथ शिंदेंपासून अजित पवारांपर्यंतच्या विरोधकांना आपल्याकडे खेचूनही उपयोग होत नाही, याची जाणीव बावनकुळ्यांना झाली असेल. यामुळे उरलेले मार्गही चोखाळा असा संदेश बावनकुळे पक्ष कार्यकर्त्यांना देत सुटले आहेत. बावनकुळे आणि त्यांच्या नेत्यांना सगळेच पत्रकार म्हणजे भाजपचे भाट वाटत आले आहेत.
ठरलेल्या वाहिन्यांच्या पत्रकारांकडून आपल्याला हवे असलेले प्रश्न विचारून घेतले की आपलं काम फत्ते, ही भाजप नेत्यांची धारणा आता फारकाळ उपयोगात येत नसल्याने सगळ्यांनाच ढाबेकरी करा, असा तोंडी फतवा बावनकुळ्यांनी काढला आहे. ढाब्यावरच्या प्रदेशाध्यक्षाकडून आणखी कसल्या अपेक्षा करणार? सार्या राज्यभर इभ्रत गेली तरी खोटं बोलण्याचे उद्योग भाजपचे नेते सोडत नाहीत. पंतप्रधान मोदीच पदोपदी खोटं बोलत असतील तर बावनकुळेंनी काय म्हणून मागे रहावं? मी तसं बोललोच नाही, असं ते खुशाल सांगू लागले आहेत. कोण कुठे रिलायन्सच्या दरबाराचे पैसे वाटतो, कोण कुठल्या खात्याला कामाला लावतो, कोणी जपान, रशियाच्या फुकट फेर्या घडवतो. याच्या होत असलेल्या चर्चांमध्ये आता नव्याने ढाब्यांचा समावेश झाला आहे इतकंच.


