महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महसूल मंत्री विखे गटाकडून आव्हान देण्याचा प्रयत्न होऊन देखील आमदार बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व कायम राहिले असल्याने ‘थोरातच सरकार’ असल्याचे संगमनेरकरांनी दाखवून दिले. संगमनेर तालुक्यात झालेल्या सात पैकी पाच ग्रामपंचायतींवर थोरात समर्थकांनी निर्विवाद विजय मिळविला. तर संगमनेर तालुक्यातील मात्र शिर्डी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या आश्वी खुर्दची ग्रामपंचायत विखे समर्थकांकडे, पठार भागातील घारगावची ग्रामपंचायत शिवसेना (ठाकरे) गटाचे जनार्दन आहेर यांनी आपल्या गटाच्या ताब्यात ठेवली.
सुरुवातीलाच संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी आणि बोरबन या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या दोन्ही ग्रामपंचायतींवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी काँग्रेसचा झेंडा फडकविला. तर तालुक्यातील आश्वी खुर्द आणि आश्वी बुद्रुक, गुंजाळवाडी, पिंपळगाव कोंझिरा व घारगाव या ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते.

संगमनेर तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी झाली. निवडणूक निकालानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी निर्विवाद वर्चस्व मिळविल्याचे समोर आले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात आपल्या समर्थकांना बळ देत या निवडणुकीत काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्री विखे समर्थकांकडे असलेल्या आश्वी खुर्दच्या एकमेव ग्रामपंचायत व घारगावचा अपवाद वगळता मतदारांनी थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला.
ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्य व सरपंचांचा थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ढोलेवाडी व बोरबनच्या सरपंचपदी अनुक्रमे शालिनी ढोले व अरुणा गाडेकर यांची बिनविरोध निवड झाली तर गुंजाळवाडी ग्रामपंचायतमध्ये थोरात गटाचे अमोल उर्फ नरेंद्र गुंजाळ, आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये थोरात गटाचे नामदेव शिंदे उर्फ पाणीवाले बाबा, पिंपळगाव कोंझिरा ग्रामपंचायतमध्ये सोनाली कर्पे सरपंचपदी निवडून आले आहेत.
याशिवाय गुंजाळवाडी ग्रामपंचायतमध्ये सर्वच्या सर्व सतरा जागांवर, आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये दहा जागांवर, पिंपळगाव कोंझिरा ग्रामपंचायतमध्ये नऊ जागांवर काँग्रेस प्रणित उमेदवार निवडून आले आहे.

