महाराष्ट्र संवाद न्यूज
जळगाव – बुधवारी पहाटे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून कोठडीचे गज कापून चार आरोपींनी सिनेस्टाईल पलायन केले होते. या चौघा आरोपींना त्यांच्या दोघा साथीदारांना अहमदनगर एलसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी शेळगाव (ता. जामनेर) येथे एका शेतातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पळालेले चौघेही आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आल्याने त्यांचा पळून जाण्याचा घटनाक्रम आता उलगडणार आहे. बलात्कार, खून, कुणाचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव या चौघा जणांना इतर कैद्यांसोबत जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या चौघांचे खटले न्यायालयात अंतिम टप्प्यात आहेत. न्यायालयात शिक्षा होण्याचे चिन्ह दिसत असल्याने या चौघा कायद्याने बुधवारी पहाटे या कारागृहातील तीन नंबरच्या कोठडीचे गज कापून आरोपींनी पलायन केले होते. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती.
पळून गेलेल्या आरोपींपैकी राहुल काळे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मच्छिंद्र जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा, तर रमेश थापा व अनिल ढोले याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. या आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध कारागृहातून पलायन केल्याचे समोर आले होते. कोठडीचे गज कापून बाहेर आल्यानंतर कारागृहाच्या बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ते एका खासगी वाहनामध्ये बसून पळून गेले होते.
यावेळी कारागृहामध्ये तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या तीनही कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केले होते. या आरोपींना पकडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे चार पोलीस पथके आरोपींच्या मागावर पाठविण्यात आली होती.
यातील एका पथकाला फरार आरोपींची कार जामनेरजवळ खराब झाल्याचे कळाले. यानंतर पथकाने तपासचक्र फिरवीत जामनेरच्या दिशेने प्रवास सुरु केला. जामनेर जवळील शेळगाव शिवारात राजपूत नामक व्यक्तीच्या एका शेतात पळालेले आरोपी लपून बसले असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. अहमदनगर पोलिसांचे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास शेळगावमध्ये पोहचले आणि त्यांनी शेताला चौरही बाजूने घेरले. पोलिसांनी घेतल्याचे लक्षात येतात या आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू शिताफीने त्यांना नगर एलसीबीने ताब्यात घेतले. यावेळी जामनेर पोलिसांनी अहमदनगर एलसीबीच्या पथकाला योग्य ती मदत केली.
फरार चारही आरोपींना मदत करणारे मोहनलाल ताजी भाटी (वडगाव शेरी), अल्ताफ असिफ शेख (पुणे) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा वृत्ताला जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
तपासात अनेक गोष्टी येणार समोर…
कारागृहातून आरोपी पळून गेल्याचे समोर येताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे आदी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन जेलची पाहणी केली. दरम्यान आरोपींना पकडण्यात यश आल्याने आता आरोपींना गज कापण्यासाठी हत्यार कसे मिळाले, पळून जाण्यासाठी वाहन कसे उपलब्ध झाले, संपर्कासाठी अँड्रॉइड मोबाईल कोणी पुरविला यासह अन्य बाबींचा उलगडा होणार आहे.





