महाराष्ट्र संवाद न्यूज
नागपूर, दि. ८ – दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यावरून राज्यभर मोर्चे, आंदोलने सुरू सुरू असताना सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री राज्यातील दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करत आहे. त्यामुळे राज्यातील दुधाकडे संशयित नजरेने पाहिले जात असून खाजगी दूध संस्थांची चंगळ सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.
दुधाच्या प्रश्नावर असलेल्या स्थगन प्रस्तावावर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी चर्चा नाकारल्यानंतर सभागृहाच्या पायऱ्यांवर थोरात यांनी दुधाच्या प्रश्नावरून सरकारला घेरल्याचे दिसून आले.
थोरात म्हणाले, दूध दरावरून राज्यभर आंदोलने सुरू आहे. शेतकऱ्यांना २४ ते २५ रुपये दराने दूध विकावे लागत आहे. दुधा पाठीमागची मेहनत लक्षात घेता २५ रुपयांनी दूध विकणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. दुधाला किमान ३५ रुपयांचा भाव मिळायला हवा. सरकारने दुधाचे भाव जाहीर करण्याचे केवळ नौटंकी केली आहे. अंमलबजावणीसाठी सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही.
दुधाच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था अवलंबून असून ग्रामीण भागात शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. अनेक बेरोजगार तरुणही या व्यवसायात आले आहेत. अशावेळी या व्यवसायाची काळजी घेणे आणि तो सांभाळणे ही सरकारची जबाबदारी आहे. यापूर्वी ज्या ज्या वेळी हा व्यवसाय अडचणीत सापडला त्या त्यावेळी सरकारने दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली.
कोरोना काळात देखील सरकारने दूध घेतले. दूध संस्थांना पावडर बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. आजही कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेशसारख्या राज्यात दुधाला पाच रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. राज्य सरकारने देखील याकडे सहानुभूतीने बघावे आणि दूध उत्पादकांना किंवा संस्थांना दूध पावडर बनविण्यासाठी अनुदान द्यावे.
अशा परिस्थितीत सरकार अथवा दुग्धविकास मंत्री या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढायला तयार नाही. उलट दुग्धविकास मंत्री राज्यातील दुधात भेसळ असल्याची टिमकी वाजवत फिरतात. यावरून या प्रश्नाचे किती गंभीर आहेत याचा प्रत्यय येतो. एकीकडे दूध दरासाठी स्पर्धा करावी लागते, राज्यातील दूध संस्थांकडून जे उपपदार्थ तयार केले जातात त्यांना देखील विक्रीसाठी संघर्ष करावा लागतो. तर दुसरीकडे मंत्र्यांकडूनच दूध भेसळीचा आरोप करीत बदनामीची मोहीम सुरू आहे. मंत्र्यांना जर असे भेसळीचे प्रकार आढळत असतील तर त्यांनी त्यावर कारवाई करावी, मात्र नाहक सरसकट राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांना बदनाम करू नये, असे देखील थोरात यांनी विखे पाटलांना खडेबोल सुनावले आहे.
परराज्यातील दूध संस्थांकडून देखील शेतकऱ्यांची पिळवणूक…
पर राज्यातील दूध संस्था महाराष्ट्रातल्या सहकारी दूध संस्थांना मोडीत काढण्याचे काम करत आहे. जेव्हा शेतकऱ्यांना भावाची गरज असते तेव्हा या संस्था शेतकऱ्यांना कमी भाव देतात. जेव्हा दूध दर स्थिर असतात त्यावेळी परराज्यातील या संस्था विनाकारण स्पर्धा तयार करून सहकारी संस्थांना उध्वस्त करत असतात. आणि ज्यावेळी त्यांची मक्तेदारी तयार होते त्यावेळी ते शेतकऱ्यांची मिरवणूक करण्याचे काम सुरू करतात असा देखील आरोप थोरात यांनी केला आहे.
मुख्यमंत्री दुग्ध विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढणार! उपमुख्यमंत्री पवार
दरम्यान यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक लावून या प्रश्नावर तोडगा काढला जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
Live : #शेतकरी विरोधी सरकार https://t.co/UbomUEy5cT
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 8, 2023

