महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर, दि. ८ डिसेंबर – शुक्रवारी संगमनेरमध्ये झालेल्या कांदा लिलावात भाव अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती बाहेर नाशिक पुणे महामार्गावर तब्बल दीड तास ठिय्या देत आंदोलन केले.
कांद्याचे फेर लिलाव करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले मात्र तरी देखील व्यापाऱ्यांकडून लिलाव सुरू होत असल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी सभापतींच्या दालना बाहेर आंदोलन सुरू केले अखेरीस सायंकाळी पाच वाजता सुमारास बाजार समितीच्या पदाधिकारी आणि सचिवांनी केलेल्या मध्यस्थीनंतर कांद्याचे फेर लिलाव पुन्हा सुरू झाले.
गेल्या काही दिवसांपासून वधारलेल्या कांद्याला शुक्रवारी थेट दोन ते अडीच हजार रुपयांचा भाव संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळू लागल्याने अचानकपणे व्यापाऱ्यांनी भाव वाढल्याने शेतकरी आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये सुरू असलेले कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वारा बाहेर नाशिक-पुणे महामार्गावर ठिय्या दिला.

आंदोलकांनी महामार्गावरच सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्याने रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. महामार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याची माहिती मिळताच पोलीस आंदोलन स्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आणि सचिव सतीश गुंजाळ यांनी कांदा व्यापाऱ्यांना आंदोलन स्थळी बोलावून घेत त्यांचे आंदोलकांशी चर्चा घडवून आणली. यावेळी व्यापाऱ्यांनी गुरुवारी रात्री केंद्र सरकारने अचानकपणे कांदा निर्यात बंदी केली असल्याने कांद्याचे भाव कोसळल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाल्याचे दिसून आले.

