महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. सरत्या वर्षात निरोप देताना अथवा नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतांनाच रस्त्यावर वाहन चालविताना स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास नुकसान पोहोचणार नाही याची खबरदारी न घेणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती संगमनेर-अकोलेचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
संगमनेर उपविभागाअंतर्गत संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, अकोले आणि राजुर पोलीस स्टेशनचा समावेश होतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वर्षभरात १३२ प्राणांकित अपघात झाले असून त्यात १३९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील बहुतांशी वाहनचालकांनी मद्यपान करून वाहन चालविल्याचे तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री बहुतांशी वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवून स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करतात, या पार्श्वभूमीवर उपरोक्त पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस प्रशासनाकडून जोरदार कारवाई केल्या जाणार आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठीक ठिकाणी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून नववर्षाच्या पहाटेपर्यंत नाकाबंदी तपासणी केली जाणार आहे. यादरम्यान मद्यपान करून वाहन चालविताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जाणार आहेत यामध्ये दहा हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. याशिवाय अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर देखील गुन्हे दाखल केले जाणार आहे.

रस्त्यावर बेशिस्त, बेदरकार वाहन चालविणे, गोंगाट करून वाहन चालविणाऱ्यांवरदेखील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
याचबरोबर या कालावधीत डीजे, वाद्य वाजवताना कोणी आढळून आल्यास डीजे, वाद्य जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपाधीक्षक वाघचौरे यांनी दिली आहे.

