नवी दिल्ली – देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या माजी पंतप्रधान नरसिंहराव व चौधरी चरण सिंह यांच्यासह कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची मोठी घोषणा आज शुक्रवारी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) केली आहे.
‘एक्स’वर पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या विषयी म्हटले आहे की, आमच्या सरकारला देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचे सौभाग्य मिळाल आहे. चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी आणि कल्याणासाठी काम केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री ते पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. आणीबाणीचा देखील त्यांनी विरोध केल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंहराव हे देखील प्रतिष्ठित विद्वान आणि राजकीय नेते होते. त्यांनी भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताला आर्थिक बाबतीत प्रगतीच्या मार्गावर जात आलं. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ते पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केले. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात भारतात उदारीकरण करण्यात आलं त्यामुळं आर्थिक विकासाच्या एका युगाला प्रोत्साहन मिळालं. भारताचं विदेश धोरण, भाषा आणि शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिल्याचं मोदींनी म्हटलं.
स्वामीनाथन यांचा गौरव करताना मोदी म्हणाले, डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी देशाच्या कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं. त्यामुळे सरकार त्यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव करत आहे.

लालकृष्ण अडवाणी वगळता इतरांना मरणोत्तर भारतरत्न
दरम्यान केंद्र सरकारने यंदा पाच जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, बिहारचे जननायक कर्पुरी ठाकूर यांच्यासह माजी पंतप्रधान नरसिंहराव, चौधरी चरण सिंह यांच्यासह कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लालकृष्ण अडवाणी वगळता इतरांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला.

