मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारण्यांमध्ये गोळीबाराच्या घटना सर्रास घडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील घटनाबाह्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्यानंतर आता हीच मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनही करण्यात आली आहे.
ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ठाकरे म्हणाले, राज्यातील घटनाबाह्य सरकारचा प्रशासनावर वचक राहिला नसून त्यांना कारभार करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला झापूनही काही उपयोग नाही. कारण हे सरकार शब्दांच्या माराच्या पुढे गेले आहे. त्यामुळे आज हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहे.
मी मुख्यमंत्री राहिलो आहे. माझ्या कार्यकाळात मी पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहिलो. त्यांना जर मोकळा हात दिला तर ते २४ तासात गुंडाना तुरुंगात टाकतील. पण सरकार गुंडाच्या मागे उभे राहिले असेल तर हिंसाचार असाच कायम राहिल.
यावेळी त्यांनी दीड वर्षांपूर्वी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत एका आमदाराने गोळीबार केला होता, त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. कदाचीत त्याला क्लीन चीटही मिळाली असेल. बोरीवलीमधील एका आमदाराच्या मुलाने बिल्डरच्या पुत्राचे अपहरण केले होते, त्याच्यावर कारवाई झाली नाही. ठाण्यात एका तरुणीवर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, पण आरोपी भाजपाचा कार्यकर्ता असल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
तसेच, काल पुण्यात पत्रकार निखील वागळे, विश्वभंर चौधरी आणि वकील असीम सरोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला नियोजित असल्याचे दिसत आहे. पण पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्याऐवजी यांनाच बसवून ठेवले. भाजपाच्या पदाधिकाऱ्याने असा हल्ला करू, अशी धमकी देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोपच यावेळी ठाकरेंकडून करण्यात आला.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जनतेसाठी खुले पत्र लिहिले होते. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याचे मान्य केले. याबाबतही उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, पोलीस महासंचालक शुक्ला यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. मला आठवत नाही, आजवरच्या इतिहासात महासंचालकांवर असे पत्र लिहिण्याची वेळ आली असावी. शुक्ला यांच्याकडे माणुसकी शिल्लक असल्यामुळेच त्यांनी असे पत्र लिहिले असावे. कारण पोलिसांवर जनतेचा विश्वास राहिला नाही, असे त्यांना कळले असावे.
राज्यात जेव्हा एखादा अनुचित प्रकार घडतो, तेव्हा त्या खात्याच्या मंत्र्याला जबाबदार धरले जाते. मंत्र्यांकडून कारभार नीट होत नसेल तर मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले जाते, पण मुख्यमंत्रीच गुंडाबरोबर फोटो काढण्यात व्यस्त आहेत. सरकारमध्ये एकमेकांकडे बोट दाखविण्याची हिंमत नाही, असाही टोला त्यांनी यावेळी राज्य सरकारला लगावला लगावला आहे.