संगमनेर – काँग्रेसला मोठा धक्का देत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाबरोबर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. आपल्या राजीनाम्यासंदर्भात चव्हाण यांनी ‘एक्स’वर माहिती दिली असून येत्या १५ फेब्रुवारीला ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.


आमदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालट सुरू असून चव्हाण यांच्यासोबत आणखी कोण आमदार भाजपच्या वाटेवर आहे याची चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्या संदर्भात उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ घडली होती. तत्कालीन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल न करता त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती आणि या मतदारसंघातून त्यांनी मोठा विजय देखील मिळवला होता. दरम्यान काँग्रेस पक्षाने तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची मोठी कारवाई केली होती. त्यानंतर देखील तांबे पिता पुत्रांची काँग्रेसशी जवळीक राहिली आहे.
चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार तांबे यांनी एक्स हॅण्डलवर म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन-मन-धनाने दिले. त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय. खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही! अशा शब्दात तांबे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
It pains me to see the current shambolic state of Maharashtra Congress, the organisation I gave 22 years of my life, blood and sweat for.
महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाची स्थिति पाहून मनाला खूप वेदना होत आहेत.
ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन, मन, धनाने दिले त्याची ही…— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 12, 2024

