- येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला सत्तेवरून पाठविण्याचा संकल्प करा: काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात
- पक्षात शिस्त असली पाहिजे. कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही: काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला
- नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
- नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, अचानक लावलेला लॉकडाऊन, शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध आणि भ्रष्टाचाराने अर्थव्यवस्थेची पिछेहाट: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
लोणावळा – काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर लोणावळा येथे पार पडले. या शिबिरात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्यासह काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, आमदार, आजी-माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात काँग्रेस नेते नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊया…
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले… सध्या काँग्रेसची नव्हे तर तत्त्वज्ञानाची पीछेहाट होत आहे. काँग्रेसला त्याग व बलिदानाची मोठी परंपरा असून या पक्षाचे आपण सदस्य आहोत याचा प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत भाजपला सत्तेवरून हटविण्याचा संकल्प करा. सध्या व्यावसायिक राजकारण झाले आहेत, सत्ता आली की तिकडे जायचे, काँग्रेसची सत्ता आली की पुन्हा काँग्रेसमध्ये यायचे. हे चालणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. सत्तेत जायचे, पैसे कमावायचे असले धंदेवाईक राजकारण चालू देऊ नका. अशांना काँग्रेस पक्षात स्थान देऊ नका. अशा धंदेवाईक राजकारण्यांना जनतने धडा शिकवला पाहिजे. राहुल गांधी यांचे कष्ट वाया जाणार नाहीत, भारत जोडो यात्रेतून सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे. आपणही जनतेकडे गेले पाहिजे, चांगले काम केले तर महाविकास आघाडी लोकसभेच्या ३८ जागांपेक्षा जास्त जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले… लोकसभेच्या निवडणुकीसाठी फार कमी वेळ राहिला आहे. आता निवडणुका सायंटिफिक पद्धतीने लढवल्या पाहिजेत यावर चर्चा झाली आहे. बुथ मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचे आहे. इंडिया आघाडीला सत्तेत आणण्यासाठी काम केले पाहिजे आणि राज्यातून सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवा. तसेच पक्षात शिस्त असली पाहिजे. कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही. एनएसयुआय, युवक काँग्रेस, फ्रंट सेल यांच्याही प्रदेश स्तरावर बैठका झाल्या पाहिजेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले… काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात एकजूट असला पाहिजे. सर्व सेल, फ्रंटल संघटना सर्वांनी सोबत असले पाहिजे. पक्षाच्या अजेंड्यावरच सर्वांनी काम केले पाहिजे व काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अजेंड्यानुसारच काम करा. लोकसभेची लढाई जिंकायची आहे हा संकल्प घेऊनच जा. आता आपल्याकडे वेळ नाही, युद्ध पातळीवर काम करायचे आहे. भाजपा कसे खोटे बोलत आहे, जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका. वातावरण काँग्रेस व मविआच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले… पंतप्रधान मोदी सातत्याने भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची असल्याचे सांगत असतात. मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेची जी गती राहिली त्याच्या तुलनेत डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या काळातील गती जास्त होती, त्याच गतीने वाढ झाली असती तर भारत आजच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला असता. युपीए काळात अर्थव्यवस्थेचा विस्तार १८३ टक्के झाला तर मोदी काळात तो १०३ टक्के झाला. नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, अचानक लावलेला लॉकडाऊन, शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध आणि भ्रष्टाचार या पाच मुद्द्यांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली. २०४७ साली भारत विकसीत राष्ट्र होणार असे स्वप्न दाखवले जात आहे पण त्यासाठी दरडोई उत्पन वाढले पाहिजे. ज्या देशाचे दरडोई उत्पन्न जास्त ते राष्ट्र समृद्ध. त्यासाठी दरडोई उत्पन्न १३ हजार ८४५ डॉलर असावे लागते. सध्या भारताचे दरडोई उत्पन्न २८०० डॉलर आहे. आणि त्यासाठी १० टक्के दराने अर्थव्यवस्था वाढली पाहिजे पण मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेचा दर ६.०-६.२५ टक्के आहे. म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ अशी मोदींची अवस्था आहे.

