संगमनेर – सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्या विखे घराण्याचा पक्ष बदलांचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे दल बदलून प्रसिद्ध असलेल्या मंत्री विखे यांनी पक्षनिष्ठेबाबत इतरांना न शिकविता स्वतः आत्मपरीक्षण करावे. आत्तापर्यंत काँग्रेसच्या जिवावर मोठ्या झालेल्या विखेंनी ज्या आईने वाढविले तिला शिव्या देण्यासारखे काम केले असल्याचे टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.
दिवटे म्हणाले, काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजपा असा वेगवेगळ्या पक्षांचा प्रवास करणाऱ्या विखेंनी पक्षनिष्ठा किंवा विचार याबाबत राज्यात कुठेही बोलू नये. कारण पक्षबदलूमध्ये राज्यात पहिला क्रमांक हा विखे घराण्याचा लागतो.
२०१९ पर्यंत भाजपा व मोदी यांच्यावर विखे टीका करत होते मात्र असा त्यांना कोणता साक्षात्कार झाला की आज त्यांना मोदी विश्वगुरू वाटत आहेत. पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येताच विखे भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये येण्यासाठी प्रयत्न करतील हे सर्वश्रुत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना संगमनेर तालुक्यातील विकास कामे आडवून ठेवणे हा एकमेव उद्योग त्यांनी केला आहे. म्हाळुंगी पुलाच्या कामासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी निधी मिळवला. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून मंत्री विखे यांनी हे काम रखडविले.
अचानक बाळासाहेब विखे यांचे नाव देण्याचा घाट घातला गेला. अजून त्या पुलाला सुरुवातही झाली नाही. भूमिपूजन प्रसंगीच नाव देण्याचा हा पहिला प्रकार घडला आहे. याला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला मात्र हा विरोध प्रशासन व पोलिसांनी दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे संगमनेरमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.
विकास कामे करायचीच आहे. तर राहता मतदार संघ तिकडे वाट पाहतो आहे. नगर-मनमाड हायवे हा गचक्यांचा हायवे म्हणून प्रसिद्ध झाला आहे. हे सगळे सोडून महसूल मंत्री फक्त संगमनेरभोवती घिरट्या घालत आहे.
संगमनेर तालुका हा कायम काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला असून महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा राहिला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राने कधीही गद्दारीला माफी केली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
म्हाळुंगी पुलासाठी विखे यांचे कोणतेही योगदान नाही…
ऑक्टोबर २०२२ मध्ये म्हाळुंगी पूल खचल्यानंतर विखे तिकडे फिरकलेही नाही. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने जनतेला दिलासा दिला नाही. उलट चालू कामांमध्ये खोडा घालण्याचे काम केले. पूलाचे फक्त राजकारण केले. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या पुलाच्या भूमिपूजनाचा समारंभ हा म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार झाल्याने नागरिकांनी विरोध केला असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.


