महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. १७ मार्च, मुंबई
अँड. असीम सरोदे यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून सरोदे यांना दोन दिवसात माफी मागा, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे सरोदे या प्रकरणी काय भूमिका घेता याकडे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण… चंद्रपूर येथील ‘निर्भय बनो’ सभेत बोलताना ॲड. सरोदे यांनी शिंदे गटाच्या आमदारांबद्दल एक मोठ विधान केलं होतं. या विधानाचे पडसाद शिंदे गटात उमटले आहे. सरोदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे बारा आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा परतणार असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी या बारा आमदारांची नावे देखील वाचून दाखवली होती.
आमदार लता सोनवणे, श्रीनिवास वनगा, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, चिमणराव पाटील, बालाजी कल्याणकर, उदयसिंह राजपूत, प्रदीप जयस्वाल, महेश शिंदे व प्रकाश आबिटकर आदी आमदारांचा यात समावेश असल्याचे सरोदे यांनी म्हटले होते.
यानंतर आता आमदार बालाजी कल्याणकर यांनी ही नोटीस दिली असून दोन दिवसात माफी मागा नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असे म्हटले आहे.


