मंगळवार दि. २ एप्रिल
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दैनंदिन भाजीपाला लिलावासोबत टोमॅटोचे देखील सोमवारपासून (१ एप्रिल) लिलाव सुरू करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली आहे.
पहिल्याच दिवशी या लिलावास शेतमाल निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. लिलावामुळे व्यापाऱ्यांमध्ये शेतीमाल खरेदी करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या मालाला देखील चांगला भाव मिळत आहे.
सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये टोमॅटोचे लिलाव सुरू आहेत. प्रतवारी करून आपला शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. शेतकऱ्यांनी माल विक्री केल्यानंतर बाजार समितीकडून तात्काळ पक्की हिशोबपट्टी देऊन मालाचा मोबदला व्यापाऱ्यामार्फत रोखीने दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक देखील टळली आहे.
त्यानंतर दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत भाजीपाला लिलाव सुरू आहेत.
शेतकऱ्यांना आपला शेतमाल शेजारच्या मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी न्यावा लागत होता. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व भाजीपाल्याचे लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टळली आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी स्थानिक व हक्काचे बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत व खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री केल्यानंतर संबंधितांकडून त्याचे पेमेंट लगेचच रोख रकमेच्या स्वरूपात घ्यावे, असे आवाहन सभापती खेमनर व सचिव गुंजाळ यांनी केले आहे.


