शनिवार, दि. १३ एप्रिल
तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. त्या पाठोपाठ आज शनिवारी त्यांनी एका पत्रकार परिषदेत मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे.
ठाकरे यांनी मुंबईत आज एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीला प्रचारात सहकार्य करायचे की नाही, यासंदर्भातील बैठक घेतली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचारात सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
एका बाजूला कडबोळे आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व अशावेळी पुन्हा त्यांना एकदा संधी देणे आवश्यक आहे वाटले. म्हणून मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे राज ठाकरे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. महाराष्ट्रासाठी आमच्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून ते गड किल्ल्यांचे संवर्धन असे अनेक विषय आहे. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र पुढारला आहे. उद्योगपतींकडून प्राधान्य देण्यात येणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मोदींना सर्व राज्य मुलांसारखे समान असले पाहिजे. त्यांना गुजरात प्रिय असणे स्वाभाविक आहे. कारण ते गुजरातचे आहे. पाच वर्षात ते सर्व राज्यांना समान पाहतील ही अपेक्षा आहे. त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यासाठीच आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली, असे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

महायुतीला प्रचारात सहकार्य करणार…
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा? कोणाशी बोलायचे? आणि पुढे कशाप्रकारे जायचे त्याची यादी दोन दिवसात तयार होईल आणि ती त्यांच्यापर्यंत जाईल. कोणाशी संपर्क साधायचा याचा घोळ नको म्हणून यादी देऊ. त्यांनाही सोयीस्कर जाईल. पूर्णपणे सहकार्य करायचे आहे. पूर्ण प्रचार करायचा आहे. संपर्क साधल्यावरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. ते आमच्या पदाधिकाऱ्यांना योग्य मानाने वागवतील अशी अपेक्षा आहे.


