प्रवीण पुरो
“न खाऊंगा, ना खाने दुंगा” या टॅगलाईनवर देशाला आणि देशातल्या जनतेला खोट्यात पाडणार्या देशाच्या पंतप्रधानांच्या साथीदारांनी, त्यांच्या पक्ष प्रमुखांनी आणि शिलेदारांनी इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून जमवलेल्या मायेचा थोडासा जरी हिशोब दिला तरी मोदी हे देशातल्या भ्रष्टाचाराचे खरे कर्दनकाळ आहेत, असं मानायला हरकत नाही. आजवर त्यांच्यावर, त्यांच्या सरकारवर आणि त्यांच्या पक्षावर झालेल्या आरोपाला साधं उत्तर देण्याचं दायित्व जी व्यक्ती पार पाडत नाही, तिला इतरांना उपदेश देण्याचा अधिकार नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजवर झाला नाही इतका मोठा भ्रष्ट कारभार भाजपच्या सरकारने आणि त्या पक्षाने केला. इलेक्ट्रोल बॉण्ड म्हणजे निवडणूक रोख्यांच्या रुपात कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवणारे त्याचा जेव्हा हिशोब नाकारतात तेव्हा त्यात खोटेपणा दडला असणं स्पष्ट आहे. याच निवडणूक रोख्यांद्वारे भाजपने आजवर सहा हजार कोटींची माया जमवली. याशिवाय तितक्याच प्रमाणातील बेनामी रोख्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याने त्याचा हिशोब तो पक्ष आणि ज्या बँकेकरवी हा घोटाळा झाला ती स्टेट बँक देऊ शकत नाही. पाच लाखांसाठी विरोधी पक्ष नेत्यांच्या घरांवर, त्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकून त्या नेत्यांना वर्षोंवर्षं तुरुंगवासात डांबणार्या ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या अधिकार्यांना हा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा दिसत नाही, यावरून या यंत्रणांमधील अधिकारी सत्तेचे कसे गुलाम झालेत ते लक्षात येतं.



