शनिवार, दि.२० एप्रिल
एप्रिल महिना निम्म्याहून अधिक उलटून गेला तरीदेखील मार्च महिन्याचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळू शकलेले नाही. मानधनाअभावी राज्यातील दोन लाख दहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू आहे. प्रचारात रममाण असलेल्या मुख्यमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित जमा करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य अध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर यांनी केली आहे.
शिवूरकर यांनी म्हटले आहे की, सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर विविध कामे लादते. निवडणूक प्रशिक्षण, आरोग्याची कामे सोपवली जातात. परंतु अल्प मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर देण्याची जबाबदारी टाळत आहे. सणासुदीच्या दिवसात मानधन नसल्यामुळे सण साजरे करणे या कर्मचाऱ्यांना मुश्कील झाले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव घोषणा द्यायची मात्र महिला व बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याना वेळेवर मानधन द्यायचे नाही, या विसंगतीकडे ॲड. शिवूरकर यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. प्रचंड उन्हाळा, पाणी टंचाई आणि उपासमारीच्या चक्रात अडकलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाच्या उदासीनतेचा अंगणवाडी कर्मचारी सभेने निषेध केला आहे. तसेच त्वरीत मानधन जमा करावे, अशी मागणी सरचिटणीस कमल परुळेकर, कार्याध्यक्ष कृष्णा भानारकर, उपाध्यक्ष नितीन पवार यांनी केली आहे.


