भाग – ४ | प्रवीण पुरो
एखाद्या व्यक्तीने किती खोटं बोलावं याला काही मर्यादा असतात. महत्वाच्या पदावर असणार्या व्यक्तीचा प्रत्येक शब्द ताऊन सुलाखून व्यक्त झाला पाहिजे. वाह्यात बोलणं संकटात टाकू शकतं. बेरक्या माणसाला त्याचं काही वाटत नसलं तरी अशा व्यक्तीमुळे पदाची आणि देशाचीही गरीमा खालावते. देशाच्या प्रधान मंत्र्याने वा राष्ट्राध्यक्षाने तर अशावेळी कमालीची सजगता राखली पाहिजे. सरकारचा प्रमुख म्हणून तर त्याच्या सहकार्यांचंही माप अशा जबाबदार व्यक्तीकडे असतं. दुर्देवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानाने या सार्या गोष्टीला फाटा देत देशाचं नाव जगभरात काळवंडलं आहे. स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणवून घेणार्या पंतप्रधान मोदींनी केलेल्या थापेबाजीची दखल आंतरराष्ट्रीय जगताने घेतली आहे. इंटरनेटच्या मायाजाळात आपल्या या चौकीदाराची म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संभवना ‘फेकू’ अशी होऊ लागली आहे.
हे चित्र देशाला भूषणावह नाही. गुगलसारख्या मायाजाळी वेबवर अशी कोणाची बदनामी होत नसते. मोदींना ‘फेकू’ गणत गुगलने सरकार आणि सरकारच्या प्रमुखांची अवकात काढली आहे. जगात ‘फेकू’ सर्च करणार्यांपुढे पहिली छबी येते ती आमच्या चौकीदार मोदींची. असं का व्हावं, की गुगलने इतकं टोक गाठावं? याचा विचार चौकीदार मोदींनी आणि त्यांच्या चौकडीने केलेला दिसत नाही. हे आज झालंय असं नाही. २०१४ साली सत्ता आल्यापासून हे सुरू आहे. याला सर्वस्वी चौकीदार मोदींची देहबोली, त्यांच्या तोंडून सहज फेकावी अशी विधाने कारणीभूत आहेत. पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने व्यक्तीगत पातळीवर उतरणं कदापि अयोग्यच. त्यात एखाद्या व्यक्तीची नक्कल करणं, त्याला हिणवणं, महिलांविषयी घृणास्पद शेरेबाजी करणं हे तर टोकाचं पाऊल झालं. खरं तर अशा जबाबदार व्यक्तीने आपण देशासाठी काय केलं, काय करणार आहोत याची धोरणात्मक मिमांसा करावी.

दुर्देवाने सत्तेच्या दहाव्या वर्षीही चौकीदाराकडून सत्यवचनाची वानवाच आहे. एक खोटं केलं की असंख्य खोट्यांची रीघ लागते. एका खोटेपणावर असंख्य उत्तरं येऊनही त्याचा साधा खुलासा होत नाही, तेव्हा तर ऐकणाराही दिग्मूड होतो. चौकीदार मोदी वगळता देशाच्या इतिहासात असा एकही पंतप्रधान झाला नाही ज्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा टिपण्ण्या करण्यात आल्या. एकाही पंतप्रधानाला सत्तेसाठी असल्या फेकुगिरीचा अवलंब करावा लागला नाही. सत्तेसाठी स्वत:बरोबर देशाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडणार नाहीत, इतका प्रामाणिकपणा या पदावरील व्यक्तींनी जपला. अपवाद आपले आजचे चौकीदार. त्यांनी हरएक ठिकाणी खोटेपणा केला. खोट्याचं खरं करतो आहोत याची जाणीव करून देऊनही ते स्वत:ला सुधारायला तयार नाहीत. खोटेपणाने स्वत:च्या नावावर त्यांनी फेकू नावाची नवी संज्ञा निर्माण करून घेतली. सत्तेसाठी चौकीदार मोदींनी खोटेपणाच्या सार्या मर्यादा पार केल्या.
जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ म्हणून लौकीक असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना त्यांनी संसदेच्या भर सभागृहात रेनकोट घातलेला प्रधानमंत्री, अशी टीका केली. जन्माला येणार्या प्रत्येक व्यक्तीने शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे. एक काळ होता जेव्हा शिक्षण घेणंही देशवासीयांना अवघड जाई. चौकीदार मोदींच्या वाट्याला अशी गरीबी आल्याचं नमूद नाही. सुबत्ता असतानाही त्यांना शिक्षण घेता आलं नाही, याची आठवण त्यांनी अनेकदा दिलेल्या मुलाखतीत करून दिली. कधी ते कटोरा घेऊन भिक मागून जगायचे, तर कधी परिक्रमा करून झोळी भरून स्वत:चं पोट भरायचे. अशा परिक्रमेत शिक्षण घेणार कुठून, असा सवाल त्यांनी प्रश्नकर्त्यांना केल्याचं आठवत असेल. अशी अशिक्षित व्यक्ती देशाची पंतप्रधान होते. यात गैर काहीच नाही. अशा असंख्य नेत्यांनी राज्यांच्या धुरा उत्तमरित्या चालवल्याचे दाखले आजही दिले जातात. त्यात सलग तीन टर्म मुख्यमंत्री असलेली व्यक्ती पंतप्रधान व्हावी यात गैर काहीच नव्हतं. पण तरीही त्या व्यक्तीला एमए झाल्याचा साक्षात्कार दाखवावा का लागावा? शिक्षण व्यवस्थेत एमएपर्यंत शिक्षण घेणं म्हणजे ती व्यक्ती किमान २३ वर्षं शिक्षण व्यवस्थेचा भाग असायला हवी. असेल तर ही व्यक्ती परिक्रमा आणि हिमालय करायला केव्हा जायची?
त्यात ‘एन्टायर पॉलिटिक्स’ नावाचा कोणताही विषय देशातल्या एकाही विद्यापीठात एमएसाठी नाही. तरी तो चौकीदार मोदींना मिळावा, यात जरूर आश्चर्य आहे. चौकीदाराला एन्टायर पॉलिटिक्सचं शिक्षण देणारा शिक्षक वा एकही सहकारी विद्यार्थी सापडू नये? खोटेपणाची साक्ष देणार्या विद्यापीठाच्या दाखल्याने चौकीदाराचा पोलखोल झाला. ज्या काळी चौकीदार मोदींनी पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं तेव्हाचे दाखले आणि आताचे दाखले यातील फरकाने भांड फुटणं स्वाभाविक. तरीही चौकीदार बनलेली ही व्यक्ती खरेपणाचा आव आणते तेव्हा अजब वाटल्याहून रहावत नाही.

चौकीदाराच्या फेकूगिरीच्या सरस कथांनी देशवासीयांसाठी स्वतंत्र मेजवानीच दिली आहे. सुरुवातीला हा चौकीदार चहावाला असल्याचं निमित्त करायचा. स्टेशनवर चहा विकता-विकता ते स्टेशन कोणतं हे ही तो विसरून गेला. चहा विक्रीच्या स्टेशनची माहिती देणारा आणि चौकीदाराच्या हातून चहा घेतल्याचं सांगणारा एकही गिर्हाईक चौकीदाराला आजवर सापडला नाही. चौकीदाराने अचानक लादलेल्या नोटबंदीच्या काळात देशवासीयांच्या हालाला पारावार नव्हता. तेव्हा एटीएममधून मर्यादित पैसे मिळायचे. पैसे मिळावेत म्हणून तासंतास एटीएमपुढे रांगांमध्ये उभं राहण्याची पाळी देशवासीयांवर ओढावली. आपल्याच पैशांसाठी प्रचंड गर्दीत उभ्या असलेल्या शंभरहून अधिकांना आपले प्राण गमवावे लागले. चौकीदाराला याचं काहीही वाटल्याचं तेव्हा जाणवलं नाही. उलट नव्वदी पार केलेल्या वृध्द मातोश्रींना एटीएमच्या रांगेत उभं करून चौकीदाराने कमालच केली.
निवडणूक जिंकण्यासाठी केल्या जाणार्या घोषणा तर सर्वसामान्य असतात. २०१४ च्या निवडणुकीत चौकीदाराने केलेल्या घोषणा ऐकल्या की हसू की रडू, अशी अवस्था होते. वर्षाकाठी दोन कोटी नोकर्या देण्याच्या आश्वासनाची चौकीदाराला साधीशी आठवण राहिली नाही. वर्षाकाठी दोन कोटी म्हणजे दहा वर्षात २० कोटी तरुणांना नोकर्या मिळणं अपेक्षित होतं. सरकारी उद्योगांची वासलात लावून ती अदानी आणि अंबानींच्या हाती देण्यात चौकीदाराचा पुढाकार असल्याने नोकर्यांचा प्रश्न हाताबाहेर गेल्यात जमा झालाय. हाताला काम नसल्याने आयआयटी झालेले तरुणही नोकरीशिवाय असल्याचं चित्र देशात निर्माण झालं. तरीही चौकीदार स्वत:ची पाठ थोपटतो आहे.
राजकारण्यांनी स्वीस बँकेत ठेवलेले पैसे भारतात आणण्याची घोषणा आणि या पैशाच्या व्याजातून प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याची थाप तर अफलातून होती. सत्तेच्या १० व्या वर्षातही या घोषणेचं काय झालं ते चौकीदार सांगू शकला नाही. नोटबंदीच्या निमित्ताने तर काळापैशाला कधी नव्हे इतका ऊत आला. काळा पैसा भारतात आणण्याची केलेली घोषणा म्हणजे जुमल्याचा नवाच अंक होता. महाराष्ट्रसारख्या राज्यातील सहकारी बँकांच्या पैशांना काळापैसा संबोधून ते बदलून देण्यात दिरंगाई करणार्या चौकीदाराने अमित शहांच्या बँकांचे पैसे मात्र नोटबंदीच्या पाचव्या दिवशी द्यायला लावले. पेटीएम सारख्या कंपन्यांना हात देत चौकीदाराने कमाईचा मार्ग मोकळा करून घेतला. गरीबांच्या नावाने जनधन योजना हा जुन्या जुमल्यात नवा जुमला होय. बँक खातं नसलेल्या गरीब, आदिवासींच्या नावे एक पैही न देता खातं उघडण्याची ही योजना. योजनेत कोट्यवधी गरीब आणि आदिवासींना बँकांशी जोडण्यात आलं. पण खात्यात पैसेच नसल्याने बँकांनी रिक्त खात्याचे पैसे वसूल करून घेतले आणि सुमारे सहा कोटी खातेदारांनी आपली खाती बंद करून टाकली.
मोफत सिलेंडरची योजनाही अशीच बासनात गेली. आपली चूलच बरी असं म्हणण्याची वेळ गरीबावर ओढावली. बेटी बचाव, बेटी पढाव या योजनेचा पुकार करताना देशात निर्भया, कठुआतील बलात्कार, कुस्तीगीर महिलांचं शोषण करणारे चौकीदाराचे फॉलॉअर निघावेत? यातल्या एकाही प्रकरणावर व्यक्त व्हायला चौकीदाराकडे वेळ नव्हता. विदेशात जाऊन स्वनावाचा घोष करून चौकीदाराने दोन दिवसात एक विद्यापीठ, आठवड्याला एक आयटीआय, दर तीन दिवसात एक आयआयटी आणि चार दिवसात एक आयआयएम निर्माण होत असल्याची थाप म्हणजे चौकीदाराचा कडेलोट. भ्रष्टाचार्यांना धडा शिकवू पाहणारा चौकीदार याच भ्रष्टाचार्यांचा पाठिराखा झाला म्हटल्यावर त्याची भलामण कोण करणार?
(लेखकाचा संपर्क क्रमांक – ८१६९१३५२५३)

