शनिवार, दि. ४ मे
गेल्या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप केल आहे. १० वर्षात मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता त्यांनी सांगावे, देश टिकविण्यासाठी आता आपल्याला या बाबींचा विचार करावाच लागेल असे सांगत भाजपाचे राधाकृष्ण विखे उघडपणे काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला जातात, ही काँग्रेसचे आमदार थोरात यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ आंबेडकर नगरमध्ये झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी वंचितचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदींचा राजकारण हे अतिशय भयानक असून काँग्रेस पक्षाने त्यांना २०१२ मध्ये मौत का सौदागर म्हटले होते ती परिस्थिती आज आली आहे. या देशाचा पंतप्रधान कोरोना काळामध्ये लोकांच्या आरोग्याशी खेळतो त्याला काँग्रेसने मौत का सौदागर म्हणणे योग्यच होते, त्याला आता आपण सत्तेवर बसवायचे का असा सवाल करत कोरोना काळात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या जगातील महत्त्वाच्या संस्थेने रेमडीसीवर देऊ नये, इतर देशांनी त्याला बंदी घातली असताना देखील पंतप्रधान मोदी यांनी त्या कंपनीला मुभा दिली. कारण त्या कंपनीचा मालक गुजराती होता. त्यामुळे मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहे, या कंपनीने इलेक्ट्रोरेड बॉन्ड खरेदी केले आणि त्यानंतर त्यांना रेमडीसीवर विकायची परवानगी दिली गेली. जो माणूस लोकांच्या जीवाशी खेळतो आणि पक्षाची तिजोरी भरतो त्याला आता आपण सत्तेवर बसवायचे का? असा सवाल उपस्थित केला.
देशाला असा पंतप्रधान मिळाला आहे की त्याने देशाला ‘बनाना रिपब्लिक’ करून ठेवले. म्हणजेच कोणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी परिस्थिती केली आहे देश कशाच्या उंबरठ्यावर आहे हे सांगण्याची आता गरज राहिली नाही. आगामी काळात आपल्याला ओबीसी समुदायाचे राजकारण पुढे आणायचे आहे त्यासाठी ही निवडणूक असून बदल हा झाला पाहिजे आणि तो आता आपल्यापासून करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
बाळासाहेब थोरातांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः अलर्ट राहावे… भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सूचक इशारा देत म्हटले की, थोरात यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. कारण भाजपाचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संपर्कात असून याचा तारीख निहाय तपशीलच त्यांनी यावेळी दिला. विखे २८ मे २०२३ ला सायंकाळी काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना भेटले. यानंतर मल्लिकार्जुन खरगे सोलापूरहुन बेंगलोरला ९ जून २०२३ ला दुपारी तीन वाजता आले तत्पूर्वी ८ जून २०२३ ला मंत्री विखे यांनी खर्गे यांच्याशी गुप्त बैठक केली. विखे काँग्रेसच्या संपर्कात आल्याने कधी काय होईल हे सांगता येत नाही असे ते म्हणाले. याशिवाय येत्या एक-दोन दिवसात मी मुंबई किंवा पुण्यात एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे देखील आंबेडकरांनी सांगितले.


