मंगळवार, दि. २१ मे
रिक्षातून फिरण्यासाठी धरणावर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ पाच जणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश असून हे सर्वजण नाशिकच्या नाशिक रोड येथील गोसावीवाडीतील रहिवाशी आहेत.
इगतपुरीच्या भावली धरणात मंगळवारी सायंकाळी या सर्वांचा बुडून मृत्यू झाला. समजलेल्या माहितीनुसार अनस खान दिलदार खान (वय १५), नाझिया इमरान खान (वय १५), मीजबाह दिलदार खान (वय १६), हनीफ अहमद शेख (वय २४), ईकरा दिलदार खान (वय १४) अशा तीन मुली व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इगतपुरी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हापासून थोडासा दिलासा मिळावा म्हणून ते धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते, त्यावेळी, रिक्षा धरणाजवळ उभी करून ते पाण्यात पोहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली. एकापाठोपाठ एक अशा सर्वच पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. याची माहिती मिळताच स्थानिक पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यामुळे गोसावीवाडी व नाशिकरोड परिसरावर शोककळा पसरली आहे.


