गुरुवार, दि. २३ मे
दिवसेंदिवस व्याप्ती वाढत चाललेल्या नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील कर्जदार आरोपी अमित वल्लभराय पंडितला औरंगाबाद उच्च न्यायालयाचे सुट्टीतील न्यायाधीश संजय देशमुख यांनी बुधवारी अंतरीम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून अटकेत असलेल्या पंडितचा कोठडीतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.
या अटींवर जामीन मंजूर…
१ लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तीन महिन्यांसाठी जामीन. आरोपी पंडित याला जामिनावर मुक्त होताच १५ दिवसाच्या आत २ कोटी तर त्यानंतरच्या ३ महिन्याच्या कालावधीत ८ कोटी ६४ लाख ३३ हजार ०४७ रुपये भरावे लागणार आहेत. पासपोर्ट जमा करावा लागेल. ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. जामिनावर सुटताच ईमेल आयडी आणि निवासी पत्ता संबंधित पोलीस स्टेशनला द्यावा लागेल. लेखी स्वरुपात तपास अधिकारी तपासासाठी बोलावू शकतील. मालमत्तेचा तपशील तपास अधिकाऱ्यांसमोर सादर करावा लागेल. पुराव्याशी छेडछाड करू नये आणि साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नये. न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन होत आहे असे जर ट्रायल कोर्ट किंवा फिर्यादीच्या लक्षात आले तर ट्रायल कोड या कोर्टाचा संदर्भ न घेता अर्जदाराचा जामीन रद्द करू शकते.
यासाठी झाली होती अटक… २९१ कोटीच्या बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी म्हणून समोर आलेल्या संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित (वय ५६) याने सुमारे ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला असल्याचा अंदाज आहे. स्वतःसह पत्नी, मुलगा आणि भागीदाराच्या नावावर त्याने बँकेतून नियमबाह्यरित्या कर्ज उचलले होते. त्या कर्जाची त्याने परतफेड केली नाही. फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानंतर १०५ आरोपींची नावे निश्चित झाली त्यात पंडित कुटुंबीयांचा समावेश होता. आर्थिक गुन्हे शाखा या घोटाळ्याचा तपास करत असताना संगमनेर शहर पोलिसांनी पंडित याला दोन महिन्यांपूर्वी १६ मार्चला अटक केली होती.
बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी म्हणाले… ठेवीदारांसाठी न्यायालयाचा हा निर्णय धक्कादायक असून उच्च न्यायालयाकडून अमित पंडीतला २ कोटी १५ दिवसांत तर ८.६४ कोटी ३ महिन्यात भरण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. यामधे पंडीत याच्या आजारपणाचे देखील कारण दिले आहे. न्यायालयाने २१ जूनची तारीख ठेवली होती. मात्र कोणालाच म्हणणे मांडण्याची संधी न देता लगेचच मुक्तता करण्यात आली. याबाबत ज्येष्ठ नागरिक, असहाय आजारी महिला ठेवीदारांच्या ठेवीच्या रकमा तातडीने मिळण्याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी ठेवीदारांची विचारविनीमय बैठक आयोजित करत आहोत.


