शनिवार, दि. १ जून
देशभरातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. ४ जून) होत आहे. नगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी लोकसभेची मतमोजणी अहमदनगरच्या एमआयडीसीमधील (नागापूर) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजल्यापासून होत आहे. या मतमोजणीसाठी सुमारे १,५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. अहमदनगर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.३ मध्ये होणार आहे.
अशी आहे तयारी…
एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल – अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात शेवगाव-पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपुर व नेवासा अशा सहा मतदारसंघांचा समावेश असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत.
मतमोजणी फेऱ्या – विधानसभा मतदार संघनिहाय असणाऱ्या व मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले ३०७ मतदान केंद्र २२ फेऱ्या, संगमनेर २७८ मतदान केंद्र २२ फेऱ्या, शिर्डी २७० मतदान केंद्र २० फेऱ्या, कोपरगाव २७२ मतदान केंद्र २० फेऱ्या, श्रीरामपुर ३११ मतदान केंद्र २३ फेऱ्या तर नेवासा २७० मतदान केंद्र २० फेऱ्या होणार आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव-पाथर्डी ३६५ मतदान केंद्र २७ फेऱ्या, राहुरी ३०७ मतदान केंद्र २२ फेऱ्या, पारनेर ३६५ मतदान केंद्र २७ फेऱ्या, अहमदनगर शहर २८८ मतदान केंद्र २१ फेऱ्या, श्रीगोंदा ३४५ मतदान केंद्र २५ फेऱ्या तर कर्जत-जामखेड ३५६ मतदान केंद्र २६ फेऱ्या होणार आहेत.
सुरक्षा व्यवस्था – मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे निगराणी होत आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय स्वतंत्र मिडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे.


