सोमवार दि. १० जून
रविवारी सायंकाळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह ७१ खासदारांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. यात देशातील २४ राज्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात उत्तरप्रदेशला प्रथम स्थान तर त्यापाठोपाठ बिहार, महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटकला संधी देण्यात आली आहे.
मोदींच्या रालोआ सरकारमध्ये सर्वाधीक ९ मंत्री उत्तरप्रदेश, ८ मंत्री बिहार, ६ मंत्री महाराष्ट्र, ५ मंत्री गुजरात, प्रत्येकी ४ मंत्री राजस्थान व मध्यप्रदेश, प्रत्येकी ३ मंत्री आंध्र प्रदेश, ओडीसा व हरियाणा राज्यातील असून याशिवाय हिमाचल १, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तेलंगणा व झारखंड प्रत्येकी २, पंजाब, गोवा, जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, अरुणाचल, तामिळनाडू व छत्तीसगड मधून प्रत्येकी एका मंत्र्याला नव्या मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे.
शपथ घेणाऱ्यात सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचे ६० मंत्री असून उर्वरीत १२ मंत्री मित्रपक्षांचे आहेत. तर तेलगू देसम पक्ष – २, जेडीयू – २, लोक जनशक्ती पार्टी – २, शिवसेना, जेडीएस, आरपीआय, आरएलडी, अपना दल, हिंदूस्थान आवाम मोर्चाला प्रत्येकी १ मंत्रीपद देण्यात आले आहे.
मंत्रीमंडळात ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि तब्बल तीन डझन राज्यमंत्री यांचा समावेश आहे. याशिवाय मोदींनी जातीय समीकरणदेखील साधण्याचा प्रयत्न केला असून मंत्रीमंडळात २७ ओबीसी, १० एससी, ५ एसटी व ५ अल्पसंख्याक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.


