मंगळवार, ११ जून २०२४
राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ सरकारचा शपथविधी सुरू असताना दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये वैष्णवदेवी दर्शनाला निघालेल्या भक्तांच्या गाडीवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात १० हिंदू भाविक ठार झाले आणि ३३ जण जखमी झाले. या रक्तपाताची जबाबदारी केंद्रातील चौकडीवर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या जोडीला असलेल्या चंद्राबाबू नायडू, नितेश कुमार तिच्यावर असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे की, काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यावर येथे सर्व काही ठीकठाक असल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देत होते. प्रत्यक्षात काश्मीरमधील हालत अधिक नाजूक होताना दिसत आहे. यापूर्वी दहशतवादी घटना काश्मीर खोऱ्यात होत असत आता मात्र कलम ३७० हटवल्यावर अतिरेकी हल्ले जम्मू क्षेत्रात होऊ लागले आहे, ही चिंतेची बाब आहे.
मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली मात्र देशाचे ग्रहयोग काही खरे दिसत नाही, असेच या भयंकर हल्ल्यावरून दिसते. अमरनाथ यात्रा, वैष्णव देवी दर्शन यासाठी हिंदू भाविक मोठ्या संख्येने जातात. मात्र आता त्या भाविकांवरच हल्ले सुरू झाले असताना पंतप्रधान मोदी आणि त्यांचे रालोआ सरकार हे उत्सवात मग्न आहेत.
कालच्या हल्ल्यात लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्या मृतदेहांची चित्रे पाहून मन अस्वस्थ होते आणि सरकारी निर्ढावलेपणाची लाज वाटते. मोदींनी काश्मीरच्या नावाने मतांचा बाजार मांडला. त्यात पुलवामासारख्या जवानांच्या हत्याकांडामुळे मोदींचे खरे रूप जगाला कळले, अशी घणाघाती टीकाही ठाकरे गटाने केली आहे.


