विशेष प्रतिनिधी / मुंबई
काश्मीर आणि मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय. सरसंघचालकांचं विधान पंतप्रधान किती गांभीर्यानं घेणार माहिती नाही. आता तरी ते मणिपूरला जाणार का? मागील आठ दिवसात तिसऱ्यांदा काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केलाय. याला जबाबदार कोण? जरी केंद्रात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं असलं तरी काश्मीरमधील हल्ले काही थांबत नाहीत? काश्मीरमध्ये ३७० कलम काढल्यानंतरसुद्धा लोकांचे जीव जात आहेत. याकडे केंद्र सरकार गांभीर्यानं का बघत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मणिपूर मुद्यावर एक वर्षानंतर सरसंघचालक मोहन भागवत बोलले हे काही कमी नाही. एक वर्षानंतरही मणिपूर अजून धुमसतंय. परंतु केंद्राकडून यावर कोणताच तोडगा काढला जात नाही. मात्र आता मोहन भागवत बोलल्यानंतर तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांभीर्यानं घेणार का? गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
देशातील मतदारांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. मतदारांनी भाजपाला नाकारलं आहे. हा धडा घेऊन आता तरी भाजपा सुधारणार आहे का? की केवळ विरोधकांना संपवणार आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
शिवसेना (ठाकरे गटाचे) मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर पार पडलं. मागील ३ टर्म मी पदवीधर मतदारसंघातून काम करत आहे. पाच वेळा पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून आम्हाला नेहमी चांगली मतं मिळाली आहेत. गेल्या वेळेस ९८ टक्के मतं मिळाली होती. मी माझ्या मुंबई पदवीधर मतदारसंघात काय काम करणार याची माहिती या संकल्पपत्रात परब यांनी दिलीय.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई पदवीधर या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व मतदार येथे सुशिक्षित आहेत. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा प्रमोद नवलकर यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांच्या कामाची पद्धत आणि भाषेवरील प्रभुत्व चांगलं आणि प्रभावी होतं. शिवसेना आणि मुंबईकर हे नातं वेगळं आहे. हे नातं आणखी घट्ट करु या. मतदानाच्या दिवशी सुट्टी नाही. त्यामुळं कामाला जायच्या आधी मतदान करुन कामावर जा आणि आम्हाला आशीर्वाद द्या असं आवाहन आणि विनंती उद्धव ठाकरेंनी मतदारांना केली. अनिल परब तुम्ही मला माझे मतदार म्हटल्याबद्दल धन्यवाद, कारण माझं पदवीचं सर्टीफिकेट खरं आहे, असं मिश्किल वक्तव्य ठाकरेंनी केलंय. यानंतर एकच हशा पिकला.
विधानपरिषद निवडणुकीबाबत नाशिक आणि कोकण येथे काँग्रेस किंवा मविआतील तुमचे मित्रपक्ष इच्छुक होते. किंवा त्यांच्याकडून काही नाराजी आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता, ते म्हणाले की, आम्ही वेळ जाऊ नये म्हणून आधीच अर्ज भरले होते. आम्ही महाविकास आघाडीसोबत विधानपरिषद निवडणुकीसाठी समझोता केला आहे. त्यामुळं आता काही नाराजीचं कारण नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.



