गुरुवार, दिनांक १३ जून २०२४
अहमदनगर जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी खते बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे मात्र बियाण्यांची खताची साठेबाजी, लिंकिंग होत असेल तर शेतकऱ्यांनी १८००२३३४००० या मोफत टोल फ्री क्रमांकावर किंवा ९८२२४४६६५५ या मोबाईल क्रमांकावर नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करत तक्रार करण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बुधवारी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आशिष नवले यांच्यासह जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निविष्ठांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग करत शेतकऱ्यांना अडचण जाणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कडक कारवाई केली जावी. त्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांमार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात येत आहे. कृषी सेवा केंद्र चालकांनी शासनाच्या नियम व अटींचे पालन करत शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा वेळेत आणि रास्त भावात उपलब्ध करून द्यावे.
निविष्ठांचा साठा आणि भाव फलक शेतकऱ्यांना दिसेल अशा दर्शनी भागावर दैनंदिन लावला जावा. ज्या कृषी सेवा केंद्रात बियाणे आणि खते यांचा भाव फलक, साठा फलक लावलेला नसेल, अशा सर्व कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी सालीमठ यांनी या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.



