बुधवार, १९ जून
दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याने गावकऱ्यांनी वाढविलेल्या दबावानंतर या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत. आई आणि तिच्या प्रियकराने हे खून केल्याचे निष्पन्न झाले.
या भावंडांचा खून आई कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाची गाडे यांनी केला असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सचिन बाबाजी गाडे याला अटक केली असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांनी दिली.
१७ एप्रिल रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (वय बारा वर्ष) व प्रणव सारंगधर पावसे (वय आठ वर्ष) या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वार्ता समोर आली होती. यामुळे तालुक्यात सर्वत्र दुःखद छाया पसरली. वर्षभर अगोदर या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत असे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान या प्रकरणाला वेगळाच वास येत असल्याने आणि योग्य रीतीने पोलीस तपास होत नसल्याने ग्रामस्थांनी नाशिक पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पोलिसांनी योग्य रीतीने तपास करत हा घातपाताचा प्रकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे याप्रकरणी नागरिकांच्या तपास यंत्रणेवर दबाव वाढला होता.
पोलिसांनी याप्रकरणी मुलांची आई कविता सारंगधर पावसे (रा. हिवरगाव पावसा) व तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे (रा. सावरगाव तळ) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता घातपाताचा प्रकार समोर आला. प्रेम संबंधाच्या कारणावरून या दोघांनी दोन्ही मुलांचा शेततळ्यात टाकून खून केल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला.


