शनिवार, २२ जून
शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे थकविल्याच्या कारणावरून २१ कोटी ०३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप (कुकडी) सहकारी साखर कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याच्या साखर आयुक्तांनी ३१ मे रोजी कुकडी (कर्मयोगी कुंडलिकराव जगताप) कारखान्यासाठी हा आदेश दिला आहे. शेतकऱ्यांचे थकविलेले पैसे परत मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या तीन आठवड्यात कोणतीही पाऊले उचललेली नसल्याचे यासंबंधीचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.
नियमानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट अदा करणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांचे पैसे थकविले गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कारखान्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.
सर्वाधिक २१ कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या श्रीगोंद्याच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कारखान्याच्या ‘आरआरसी’चा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालकांनी आयुक्तांकडे पाठविला होता. त्या संदर्भात साखर आयुक्तांकडे सुनावणी झाली होती. या सुनावणी दरम्यान कारखान्याला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतर कारखान्याने शेतकऱ्यांच्या देय रकमेतील काही रक्कम अदा केली असून सध्या १५ कोटी ६३ लाख ४६ हजार रुपयांची शेतकऱ्यांची थकबाकी कारखान्याकडे आहे. याशिवाय त्यावर पंधरा टक्के व्याजदर आकारला जाणार आहे.
कारखान्याने शेतकऱ्यांना त्यांची देय असलेली रक्कम न दिल्यामुळे कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊन त्यावर शासनाचे नाव लावले जाणार आहे. याशिवाय कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून साखर, मोलॅसिस व इतर उत्पादने जप्त करून त्याची विक्री करून ही रक्कम वसूल करावी, असा आदेश साखर आयुक्तांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.


