रविवार, ३० जून
शिधापत्रिकेच्या माध्यमातून धान्याचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका धारकाला संपूर्ण कुटुंबाची ई-केवायसी करणे रविवारपर्यंत बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेत आलेल्या अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांना आणखी वेळ देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली.
या अनुषंगाने आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार यांनी रविवारी तहसीलदार मांजरे यांची भेट घेत या प्रक्रियेतील अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी धान्य प्रक्रियेतून मुकण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी तहसीलदारांनी या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांना दिली.
रविवारपर्यंत लाभार्थी कुटुंबांनी ई-केवायसी केली नाही तर एक जुलैपासून त्यांना मिळणारे धान्य बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र ई-केवायसी करताना या प्रक्रियेत बऱ्याचदा मशीन बंद पडण्यासारख्या घटना दीर्घकाळ घडल्या. याशिवाय कुटुंबातील काही सदस्य घरगुती अडचणींमुळे एकाच वेळी उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांना अद्यापही ई-केवायसी करता आलेली नाही. अनेकांच्या अंगठ्याचे ठसे मिळत नसल्याने त्यांना देखील अडचणी आल्या. नोकरी, शिक्षण यामुळे बाहेरगावी असलेल्यांना देखील ई-केवायसी करणे शक्य झाले नाही. शिवाय ई-केवायसी एकाच वेळी झालेली लाभार्थी कुटुंबांची गर्दी यामुळे देखील या प्रक्रियेला विलंब लागत होता.
त्यामुळे प्रशासकीय स्तरावर देखील तहसीलदारांमार्फत पाठपुरावा सुरू असल्याने, या प्रक्रियेतील अडचणी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्याने या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळू शकणार आहे, असे देखील कासार यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले.


