मंगळवार, ०९ जुलै | संगमनेर
महाराष्ट्र पोलीस दलातील डीवायएसपी, एसीपी बढती घोटाळ्याची चर्चा असतानाच आता नगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांना बदल्याच्या ठिकाणी नियुक्त न करणे, बदल्याच्या ठिकाणी न सोडणे याबाबतच्या घोटाळ्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहे. नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आदेश देवूनही अद्यापही बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. तसेच दोन गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली व नेमणूक नसतानादेखील त्याला पोलीस अधीक्षकांचे खास मर्जी असल्याने नगर एलसीबीच्या विशेष पथकात वर्षभरापासून ठेवले असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याची तक्रार खासदार निलेश लंके यांनी देखील केलेली आहे.
नगर जिल्ह्यातील पोलीस पथकांच्या विविध कारवाया आणि त्यामागे होणाऱ्या संशयास्पद हालचाली हा नेहमीचा चर्चेचा आणि गुंतागुंतीचा विषय ठरलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा एलसीबीच्या पथकाचे विविध संशयास्पद कारणामे जिल्ह्यातील वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहेत. पोलीस दलामध्ये विविध पथके असून देखील जिल्ह्यातील गुन्हेगारी मात्र वाढती आहे. फक्त कागदावरच कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. अवैध धंद्यांसाठी कुप्रसिद्ध असलेला नगर जिल्हा आता संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वन असल्याचे आढळून येत आहे. गावठी कट्टे आणि गोळीबार यात तर जिल्हा आघाडीवर आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील (नगर एलसीबीच्या) अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन देखील त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही. यावर येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी सात दिवसाच्या आत सदर कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात यावे असे आदेश दिले होते. आदेश देऊन चार महिने होऊन गेले तरीही पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्याबाबत कुठलीही कार्यवाही केलेली नाही. या कर्मचाऱ्यांची मात्र जिल्ह्यात एलसीबीच्या माध्यमातून धुळवड चालू असल्याचे आरोप होत आहेत.
याच पथकांमध्ये पोलीस नाईक पदावर एक कर्मचारी असून या कर्मचाऱ्यावर दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी असून देखील आणि त्याची नगरमध्ये बदली झालेली नसताना देखील पोलीस अधीक्षकांनी खास त्याला एलसीबीच्या पथकात विना बदलीचे आणून ठेवलेले आहे. हा कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारच्या वसुली उद्योगात आघाडीवर असल्याचे बोलले जात असून थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये देखील हस्तक्षेप करून सेटलमेंट करण्यात मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याने या कर्मचाऱ्यावर पोलीस अधीक्षकांची खास मर्जी असल्याचे देखील सांगण्यात येते.
एलसीबी मधील सुमारे २५ ते ३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असून त्यांना अद्यापपर्यंत बदलीच्या ठिकाणी सोडलेले नाही. या बदल्या होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांना सोडण्यात येईल असे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले होते. निवडणुका होऊन खासदारांचा शपथविधी देखील झाला आहे. त्यातीलच नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी देखील एलसीबीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तरीही पोलीस अधीक्षक या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालीत असल्याचे चित्र आहे.



