शनिवार १३ जुलै
संगमनेरच्या पठार भागातील आंबी खालसा परिसरात घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण पठार भागात उमटले असून शुक्रवारी कथित जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात पठार भागातील गावांमध्ये बंद पाळत घारगावमध्ये सकल हिंदू समाज हिंदू संघटनांच्यावतीने आंबी खालसा ते घारगाव असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिहादी प्रवृत्ती विरोधात जनजागृतीसाठी जाहीर सभा पार पडली.
घारगाव परिसरातील एका तरुणाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मदत घेऊन ७ जुलै रोजी साडेअकराच्या सुमारास घारगाव बसस्थानक परिसरातून एका तरुणीला पळवून नेले; परंतु घारगाव पोलिस ठाण्यात केवळ हरवल्याची नोंद करण्यात आली. या प्रकाराने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त केला जात होता.
हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच घारगाव पोलिसांनी बुधवारी (१० जुलै) संबंधित तरुण व तरुणीला ताब्यात घेतले. त्यांचा जवाब नोंदविण्यात आला. मात्र त्यांनी प्रेमविवाह केल्याचे समोर आल्यानंतर त्यांना घारगाव पोलिसांनी बंदोबस्तात सुरक्षित व अज्ञात ठिकाणी पोहोचविल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जनआक्रोश मोर्चा निघाला होता. या वेळी हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे मिलिंद एकबोटे, गुलाब भोसले, योगेश सूर्यवंशी, बाळासाहेब ढोले, सुरेश कान्होरे, किशोर डोके, रोहिणी राऊत, कुलदीप ठाकूर, गजेंद्र घोडके, रमेश आहेर यांनी आक्रमक भूमिका मांडल्या.
आमची मुलगी जशी गेली, तशी परत आणून द्या, तिला सुरक्षा द्या, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, अवैध धंदे बंद करा, त्या तरुणाला अटक करा, त्याला फंडिंग कुठून आले याची चौकशी करा, त्या मुलीच्या काही मैत्रिणी त्या मुलाच्या संपर्कात असून त्यादेखील पळून जाणार असल्याचा संशय असून, त्यांची चौकशी करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांसह, नागरिक, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कायकर्ते सहभागी झाले होते.


