मंगळवार, १६ जुलै
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाच्या झालेल्या दुरवस्थेवर सोमवारी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने एका बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकताच काही वेळातच या मार्गाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांसह स्थानिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

या मार्गाची काही छायाचित्रे या परिसरातील स्थानिक जागरूक नागरिकांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला पाठविली होती. संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास गेल्याने हा मार्ग अतिशय चांगला झाला, हा समज संगमनेरात सध्या सुरू असलेल्या पावसाने खोटा ठरविला असून यामुळे ठेकेदाराच्या कामाची पोलखोल झाली आहे. यामुळे सरकारचा या कामावरील पैसा पाण्यात गेला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र संवाद न्यूजने सर्वप्रथम प्रसिद्ध केलेल्या बातमीची लिंक…
https://maharashtrasanvadnews.com/?p=16053
विशेष म्हणजे रस्त्याच्या कामासोबतच दुतर्फा साईड गटारीचे काम करणे आवश्यक होते. यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी वाहून जाण्यास मदत झाली असती. मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारचे कोणतेही काम करण्यात आले नसल्यामुळे रस्त्यावर असणाऱ्या पाण्याने रस्ता उघडण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या कामावर रस्त्याच्या दुतर्फा साईड गटारीचे काम का झाले नाही असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्ता अनेक ठिकाणी उखडला असल्याचे दिसते.
रस्त्याच्या संदर्भातील वस्तुस्थिती समोर आणल्यानंतर काही तासातच या रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. महाराष्ट्र संवाद न्यूजच्या बातमीचा हा परिणाम असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगत रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची छायाचित्रे देखील पाठविली. मात्र रस्त्याच्या कामाची वस्तुस्थिती समोर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


