गुरुवार, २५ जुलै
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाल्यापासून संगमनेर तालुक्यात फक्त ५०% महिलांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात गुरुवार व शुक्रवारी (२४ व २५ जुलै) सकाळी ९ ते ४ या वेळेत प्रत्येक गावामध्ये विशेष मोहीमेअंतर्गत राहिलेल्या सर्व पात्र महिलांची नोंदणी करून घेतली जाणार आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी दिली.
महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्ष असलेल्या महिला भगिनींसाठी दरमहा दीड हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला आहे. या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम घेतली जाणार आहे.
महायुती सरकारची बदनामी करण्यासाठी काही महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न संगमनेर येथे सुरू असल्यामुळे तो हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी, महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केलेल्या मागणीनुसार ही मोहीम राबविली जाणार आहे. ज्या महिलांनी ऑफलाईन फॉर्म भरून दिले आहे परंतु त्यांचे अजून ऑनलाईन फॉर्म भरले गेले नाही त्यांनी पुन्हा नव्याने फॉर्म भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संगमनेरच्या संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी केले आहे.
दोन दिवस होणाऱ्या विशेष मोहिमेसाठी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, शक्ती केंद्रप्रमुख व त्या-त्या गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गावात योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांशी संपर्क साधून लाभ मिळवून द्यावा.
या विशेष मोहिमेसाठी ग्रामस्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, सीआरपी बचतगट, अध्यक्ष सचिव सदस्य बचत गट, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर, पर्यवेक्षिका, सेतू ऑपरेटर उपस्थित राहणार आहे. तरी सर्व महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमोल खताळ, वैभव लांडगे, कविता पाटील, शरद गोरडे, रौफ शेख, अतुल कासट, सरपंच संदीप देशमुख, मयूर दिघे, सरपंच श्रीनाथ थोरात, सरपंच शशिकला आहेर, रोहिदास साबळे, हरीश वलवे, शिवाजी आहेर, संदेश देशमुख, सतीश गोपाळे, रोहिदास गुंजाळ, सुयोग गुंजाळ, सुरेश लांडगे, शशिकांत मतकर यांनी केले आहे.


