
दुसर्यावर आरोप करणारा आपण किती पाण्यात आहोत, याचा विचार कधीच करत नसतो. नैतिकता गुंडाळलेल्यांकडून तर याची अपेक्षाही नसते. तेव्हा अमित शहा आणि त्यांच्या कंपुतली माणसं कोणावर काय टीका आणि आरोप करतात याकडे पाहावं अशी परिस्थिती नाही. मात्र यामुळे परिस्थिती बिकट बनते, अनेकांच्या भावना दुखावतात, मनं विस्कळीत होतात, असं होणं हेही अयोग्यच. म्हणूनच अशा बावळट आणि अहंकार्यांचा समाचार घेणं अगत्याचं ठरतं. गेल्या रविवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा पुण्यात येऊन गेले. लोकसभा निवडणुकीत सपाटून आपटलेल्या भाजपच्या पदाधिकार्यांना जागं करण्यासाठी पक्षाने पुण्यात कानफुंकणीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात विरोधकांवर मनसोक्त टीका करून शहांपासून फडणवीसांपर्यंतच्या नेत्यांनी स्वत:चं समाधान करून घेतलं आणि टाळ्या मिळवल्या. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मार बसलेल्या या मंडळींना विरोधकांची ताकद ही आपल्या नाकर्तेपणाबरोबरच सहानुभूतीची होती, हे अजूनही मान्य झालेलं दिसत नाही.
अशी बडबड आणि उचकवण्याची भाषा वापरून विरोधकांचं काहीही बिघडणार नाही. त्याचा फटका बसला तर आपल्याच पक्षाला बसेल हे या मंडळींना कबूल नाही. आपल्या अहंकाराचा फायदा विरोधकांना होत असतो, तो लोकसभेत झाला तसा आता विधानसभेतही होईल. तो कदाचित लोकसभेहून दारूण असेल. फाजील आत्मविश्वासाच्या आणि सत्ता आणि पैशाच्या अहंकाराने सारं काही जिंकता येत नाही, हे लोकसभा निवडणुकीत शिकायला मिळूनही ज्यांना कळत नाही, त्यांना विधानसभेत काय होईल, हे सांगणंही वेडेपणाचं आहे. अमित शहांनी या सभेत येऊन कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्याचा म्हणे प्रयत्न केला.
निवडणुकीत मतदान करणार्या पक्षीय कार्यकर्त्यांची सरासरी ही ३५ टक्के नोंदली जाते. इतर ६५ टक्के हे सामान्य मतदार असतात. ज्यांना ना शहांशी देणं ना मोदींशी. एकूण परिस्थितीची जाणीव ठेवून ते आपलं मत बनवतात. तेव्हा पुण्यात येऊन शहा काय म्हणाले याचा काहीही फरक येणार्या निवडणुकीत पडण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रातली जनता समजदार आहे. असल्या वायफळ आरोपांकडे त्यांनी लक्ष दिलं असतं तर राज्यात भाजपला २८ पैकी २५ जागा नक्की मिळाल्या असत्या. सारी शक्ती हातात असतानाही नऊ जागा मिळवता मिळवता नाकीनऊ आलं. यावरून भाजपचे नेते काही शिकतील, असं वाटत होतं. पण सत्तेचा अहंकार त्यांना गप्प बसू देत नाही. त्यात मोदी आणि अमित शहा किती खोटे आणि फेकू आहेत, याची जाण राज्यातल्या जनतेला पुरेपूर आहे. यामुळे असले आरोप, नको त्या कोट्या आणि वायफळ टीका करून काहीही फरक पडत नाही.
ज्या पवारांवर टीका करतो त्याच पवारांचा आपल्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने केलेला सन्मानही शहा विसरलेले दिसतात. नरेंद्र मोदींनी तर आपण शरद पवारांचा हात पकडून राजकारण शिकल्याचं जाहीररित्या म्हटलं होतं. अशा पवारांना मोदींनी भटकता आत्मा म्हणून संबोधलं होतं. यावरून हे दोन नेते किती खोटारडे आहेत, हे लक्षात येतं. प्रश्न आहे तो ज्याने आरोप केला ते किती पाण्यात आहे याचा. अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका करताना ते भ्रष्टाचारांचे सरदार असल्याचं म्हटलं. पवारांचं राजकारण सर्वथैव योग्य होतं, असं कोणीही म्हणणार नाही. पण ते भ्रष्टाचारांचे पाठीराखे होते आणि तेच भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार होते, असं म्हणणं अतिरेकी होय.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या कथित सिंचन घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढली तेव्हा पवारांनी विरोध केला वा सत्तेमधून पायउतार झाले असा काही प्रसंग कोणाला आठवत नाही. नाराजी व्यक्त करणं म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणं असं कोणी म्हणत असेल तर त्याच्या अकलनाचा तो प्रश्न होय. पवारांनी भ्रष्टाचाराला साथ दिली असं एकवार मान्य केलं तरी भाजपच्या भ्रष्ट कारभाराची तेव्हाच्या कारभाराशी तुलना होऊ शकत नाही. पण कार्यकर्त्यांपुढे आल्यावर काहीबाही बोलल्याशिवाय टाळ्या मिळत नाही, हे अमित शहा आणि फडणवीस यांना ठावूक आहे. यातूनच त्यांनी झोडा आणि ठोकायची भाषा सुरू केली आहे.
पवारांवर टीका करता करता शहांनी उध्दव ठाकरे यांना औरंगजेबाचे फॅन ठरवून टाकलं. आणि राहुल गांधींवर ते अहंकाराने फुगल्याचं शहा म्हणाले. इतकं असतानाही महाराष्ट्रात पवार, ठाकरे आणि राहुल यांच्या आघाडीलाच लोकांनी जनाधार दिला हे या नेत्यांना मान्य आहे की नाही? लोकसभा निवडणुकीतील पराभवाची भरपाई विधानपरिषदेच्या निवडणुकीत करण्यात आल्याची फुशारकी मारणार्यांची अक्कल गुडघ्यात असल्याचंच द्योतक आहे. या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे सत्ताधार्यांचे आणि विरोधकांचे आमदार निवडून येणार होते ते आलेही. मिलिंद नार्वेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली नसती तर जयंत पाटील हे सहज निवडून आले असते, हे साधं गणित असताना पाटील पराभूत झाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्यांना अर्धवटरावच म्हटले पाहिजे. देशभर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत स्वत:च्या १० पैकी केवळ दोन जागा मिळवणारे भाजपचे नेते परिस्थितीचा अंदाज घेऊन उत्सव साजरा करतात.
भारतीय राजकारणाची मोदी आणि शहा यांनी लावलेली वासलात कोणीही विसरू शकत नाही. हे दोन नेते भ्रष्टाचार्यांचे मेरूमणी आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जप करायच्या माळेतील प्रमुख मण्याला मेरूमणी म्हटलं जातं. भ्रष्टाचाराने माखलेल्या भाजपच्या माळेतील शहा आणि मोदी हे मेरूमणी होत, हे गेल्या १० वर्षांच्या सत्तेने दाखवून दिलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात खोट्या कथनकाचा फटका बसल्याचं सांगणारे अमित शहा मोदींच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांनी मिंट दैनिकातील संविधानाच्या विषयाच्या लेखात काय म्हटलं ते वाचावं. संविधान बदलण्याचं डोक्यातच नव्हतं असं सांगणार्यांनी भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख असलेल्या अमित मालवीय, माजी मंत्री अनंतकुमार हेगडे असल्या बोलघेवड्या मुसक्या का आवळल्या नाहीत? ही मंडळी संविधान बदलाच्या आरोळ्या ठोकत होती तेव्हा मोदी-शहा संधीची वाट पहात होते.
अति झाल्यावर आणि आपल्याला फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यावर या दोघांनी पळ काढला. त्यांना सारं नरेटिव्ह वाटायला लागलं. राहिला प्रश्न भ्रष्ट कारभाराचा. सत्तेच्या दहा वर्षात भाजपने पोसलेल्या भ्रष्ट नेत्यांची यादीच आता प्रसिध्द होऊ लागली आहे. ज्यांच्यावर आरोप केले त्यांचं मंत्रिपदं देऊन पुनर्वसन केल्याची साधी लाजही भाजपच्या नेत्यांना नाही. आदल्या रात्री कारवाईची घोषणा करायची आणि दुसर्या दिवशी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उरकायचा असा खेळ भाजपने खेळला. मिळालेल्या सत्तेची इतकी चेष्टा आजवर कोणीच करू शकला नाही ती मोदी आणि शहांनी केली. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बोलायला या मंडळींना अधिकारच नाही. तरीही ते स्वत:ला मात्र हरिश्चंद्राचा अवतार समजतात तेव्हा त्यांच्या खोटेपणाची करावी तेवढी किव कमीच.
मोदींच्या सरकारने नोटबंदीपासून इलेक्ट्रोल बॉण्डपर्यंत आणि पीएम केअर फंडापासून सीएसआर फंडापर्यंत केलेला भ्रष्टाचार लक्षात घेतला तर एक गोष्ट मान्य करावी लागते ती म्हणजे ७० वर्षांच्या काळात काँग्रेसला जे करता आलं नाही ते भाजपने करून दाखवलं. देशात ४०० पारचा नारा देणार्यांची अवस्था जनतेने अशी करून ठेवलीय की ते यापुढे असले नारे देता चारदा विचार करतील. पण अकलेचे दिवाळे निघालेल्यांना हे सांगायचं कोणी? महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याची भाषा करणार्यांची जागा राज्यातल्या जनतेने दाखवून दिली तेच आता राज्यात २०० पारचा नारा देऊ लागले आहेत. बुध्दी ढिसाळ झाल्याचंच हे द्योतक होय. लोकांना गृहित धरल्याचे परिणाम एकदा दिसल्यावर शहाणं होण्याऐवजी नेते वायफळ बोलून स्वत:बरोबरच पक्षाचंही हसं करतात. तेव्हा पवार, राहुल आणि उध्दवकडे बोट दाखवण्याऐवजी भाजप नेत्यांनी आपण किती पाण्यात आहोत ते एकदा पहावं…
(लेखकाशी संपर्क भ्रमणध्वनी – ८१६९१३५२५३


