शुक्रवार, ०९ ऑगस्ट
संगमनेर – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विद्यमान महसूल मंत्री यांनी संगमनेरमध्ये महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांच्या वितरणाचा कार्यक्रम ठेवला. मात्र या कार्यक्रमात लाभार्थी आणि नागरिकांनी मोठी उदासीनता दाखवली, कार्यक्रमाला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थिती बंधनकारक करून कार्यक्रम करणे चुकीचे असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे
याबाबत पत्रकाद्वारे दिवटे यांनी म्हटले आहे की, सरकारच्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेच्या असतात. सरकार हे कोणत्याही एका व्यक्तीचे नसते. मात्र अहमदनगर जिल्ह्यात संपूर्णपणे चुकीचे चित्र निर्माण केले जात आहे. पालकमंत्र्याच्या नावाखाली भाजपचे काही कार्यकर्ते संगमनेरमध्ये दमदाटी करत आहेत. अशा वर्तनामुळे महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला लाभार्थी व नागरिकांनी मोठी उदासीनता दाखवली असल्याचे म्हटले आहे.
काही मोजके कायमचे टोळके आणि शासकीय महसुली कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी, याच्याबरोबर अनेक शिक्षकांना बंधनकारक करून या कार्यक्रमाला आणले होते. पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थिती बंधनकारक ठेवून वेठीस धरणे अत्यंत चूक आहे. शिवाय या सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी सुद्धा घेण्यात आली. हे अत्यंत निंदनीय आहे
खरे तर महसूलमंत्री हे मोठे पद आहे, मात्र सध्याचे महसूल मंत्री हे फक्त राहता व संगमनेर या दोन तालुक्यापुरतेच आहेत. भाजपकडून सातत्याने जनतेला भुलथापा दिल्या जात आहेत. जनतेने लोकसभेला भाजपला मोठा धडा शिकवला. तसाच प्रकार आता विधानसभेत होणार असून भाजपचा सुपडा साफ होणार आहे.
याचबरोबर अवघ्या दोन महिन्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येणार असून युती सरकारच्या सर्व योजना फक्त या निवडणुकी पुरत्याच असल्याने संगमनेर तालुक्यातील सुसंस्कृत व सुज्ञ जनता अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू शकत नाही, असेही दिवटे यांनी म्हटले आहे.


