सोमवार, १२ ऑगस्ट
प्रशासकीय कालावधीत संगमनेर नगर परिषदेने पाणीपट्टी व इतर करांमध्ये केलेली दरवाढ मागे घ्यावी, यासाठी काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. वाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचादेखील इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम सर्वसामान्य माणसांना भोगावे लागत आहे. चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, व महागाई वाढली असेल सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत गेल्या अडीच वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये नगरपरिषदेने अन्यायकारक पद्धतीने पाणीपट्टी व अन्य करांमध्ये मोठी वाढ केली आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, माजी नगरसेवक शैलेश कलंत्री, नितीन अभंग, किशोर पवार, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे, नूरमोहम्मद शेख, निखिल पापडेजा, लाला खान, गौरव डोंगरे, हर्षल अभंग, कमलेश उनवणे, अभय जोंधळे आदी उपस्थित होते. निवेदन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी स्वीकारले.
काँग्रेसच्यावतीने या निवेदनात म्हटले आहे की, मागील अडीच वर्षापासून नगरपरिषदेत प्रशासकीय काळ आहे. परंतु या प्रशासकीय काळामध्ये प्रशासनाने अन्यायकारक पद्धतीने संगमनेर शहरांमध्ये पाणीपट्टी व इतर करात मोठ्या प्रमाणात दरवाढ केलेली आहे. ही दरवाढ सध्याच्या महागाईच्या काळात व मार्केटमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणातील मंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
त्यामुळे नगरपालिकेच्या प्रशासनाने तातडीने केलेली करवाढ मागे घ्यावी. अन्यथा संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


