सोमवार, १९ ऑगस्ट
मुंबई : आम्ही राजकारणात ३० ते ४० वर्षे काढली आहेत. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री बनू नये का? केवळ प्रस्थापितांनीच मुख्यमंत्री बनायला पाहिजे का? उद्धव ठाकरे यांच्यावर नव्हे, तर आमच्यावर अन्याय झाला आहे. मुख्यमंत्री बनण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते व यासाठी त्यांनी गुप्तपणे रणनीती आखली होती. त्यामुळेच त्यांनी भाजपशी युती तोडून मविआचा पर्याय निवडला, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे, याची त्यांनी मला कल्पना दिली असती तर मी स्वतः त्यांच्यासाठी वातावरणनिर्मिती केली असती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात मी मंत्री असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून माझ्या खात्यात हस्तक्षेप करत होते. निवडणुकीनंतर त्यांनी मला जर सांगितले असते की, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे तर मी वातावरणनिर्मिती केली असती. पण, त्यांनी सर्वच बाबी अत्यंत गोपनीय पद्धतीने केल्या. राजकारणात कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. उद्धव यांनी मला सांगितले की, शरद पवारांनी मला मुख्यमंत्री व्हायला सांगितले. तर शरद पवारांनी मला सांगितले की, उद्धव यांच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा तुमच्या पक्षाचा निर्णय होता.
भाजपने उद्धवना कोणतेच आश्वासन दिले नव्हते…
भाजपच्या वरिष्ठांनी मला सांगितले की, मित्र पक्षाला जर अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद द्यायचे ठरले असते तर त्यात कोणतीच अडचण नव्हती. भाजपने अनेक राज्यात मित्र पक्षांच्या कमी जागा येऊनही त्यांना मुख्यमंत्रीपद दिले आहे. मात्र, २०१९ मध्ये विधानसभेचे निकाल आले तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत. उद्धव ठाकरेंना हे समजले की, त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे असल्यास भाजपाशी युती करून चालणार नाही. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचा पर्याय उभा केला, असा आरोप शिंदे यांनी केला.
देशमुखांच्या काळात राजरोस भ्रष्टाचार…
अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना राजरोस भ्रष्टाचार चालला होता. त्यावेळी मी उद्धव ठाकरे, अजित पवार यांना त्याची कल्पना दिली होती. या भ्रष्टाचाराला चाप लावा, असे मी सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्याची किंमत अनिल देशमुख यांना मोजावे लागली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना याबाबत फैलावर घ्यायला पाहिजे होते, असेही शिंदे म्हणाले.
मला ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यायला नकार…
गडचिरोलीचा पालकमंत्री असताना मला झेड प्लस सुरक्षा प्रदान करायची होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्या गोष्टीला नकार दिला. माझ्या विरोधात काय काय शिजत आहे हे मला समजत होते. मला तेव्हा धमक्या आल्या होत्या. कारण नक्षल्यांचा खत्म करण्याचे काम मी केले होते. त्यावेळी मला ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचा विषय आला होता. गृहमंत्र्यांनी ठरविले की ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यावी. मात्र उद्धव ठाकरे यांनी फोन करून मला तसेच सुरक्षा देऊ नये, असे सांगितले. त्याबाबत मला गृहमंत्री कार्यालयातूनच फोन आला होता. त्यावेळी मला अडकवण्याचा आणि तुरुंगात धाडण्याचाही प्रयत्न झाला. माझ्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला. ते विरोधी पक्षनेते होते, मात्र मी तर उद्धव ठाकरेंच्या जवळचा होतो. त्यामुळे ते माझ्याशी असे का वागले याचे मला नवल वाटले, असे ते म्हणाले.


