बुधवार, दि. ०४ सप्टेंबर
पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे सातत्याने वादात सापडणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शांतता समितीचे नेमके सदस्य कोण असा प्रश्न उपस्थित करत या बैठकीला जाणीवपूर्वक डावल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केला आहे.
मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या सभागृहात पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावर्षी संगमनेर शहराची, येथील सण उत्सवाची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या (बढतीवर बदली झालेल्या पोलीस उपअधीक्षकांचा अपवाद वगळता) हातात गणेशोत्सवाची सूत्रे गेल्याने काही ठराविक लोकांनाच त्या बैठकीचे निमंत्रण दिले गेले.
अचानक तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस खात्याचे अधिकारी समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण मिळवत असतात. मात्र सध्या संगमनेरमध्ये पोलीस खात्यात सगळेच नवखे अधिकारी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहेत. त्यातही त्यांच्या भोवती काही ठराविक लोकांचा गोतावळा जमल्याचे दिसते.
मंगळवारी झालेल्या या बैठकीवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला डावलण्यात आले. यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नाही. विशेषतः शांतता समिती बैठकीवेळी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना बोलावले जाते. कालच्या बैठकीत मात्र बऱ्याच जणांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप होत आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असताना सण-उत्सव देखील एकत्रितपणे साजरे केले जातात. कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वजण काळजी घेत असतात. कोणत्याही सण उत्सवाच्या काळात शहर शांत कसे राहील, कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी कशी होईल याची काळजी घेतली जाते. संगमनेरकर प्रशासनाला नेहमी साथ देत असतात.

मंगळवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत आमच्या असं निदर्शनास आले की आम्हाला कुठेतरी जाणीवपूर्वक दावलले जात आहे. त्यामागे काय कारण असू शकते असा प्रश्न देखील आम्हाला पडला आहे आणि तो आम्हाला स्वतः होत आहे. कुठेतरी आम्हाला वाटतं आपण सर्वांनी एकत्रच राहाव. पण शांतता कमिटीच्या मीटिंगला न बोलावून पोलीस प्रशासन नेमका काय संदेश देत आहे, याचे उत्तर आम्हाला हवंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा शहराध्यक्ष या नात्याने प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या देखील हा प्रकार निदर्शनास आणून दिला जाणार आहे. – कैलास कासार, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले)


