गुरुवार, १७ ऑक्टोंबर
अहिल्यानगर – निवडणूक कालावधीत शासकीय कार्यालयांच्या परिसरात निवडणूक प्रचार करण्यास बंदी असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी म्हटले असून तसे आदेश निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ही बंदी राहणार आहे.
बंदी दरम्यानच्या या कालावधीत कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी सभा घेणे, रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भात पोस्टर्स बॅनर्स पॅम्प्लेटस्, कट आऊटस् किंवा जाहिरात फलक लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, या आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे, मतदारांना प्रलोभन दाखविणे, निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे, राजकीय कामासाठी सदर आवाराचा वापर करणे इत्यादी बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


